मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान
परभणी : परभणी शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततधार पावसामुळे छोट्या-मोठ्या नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला असून, सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे. १२ सप्टेंबरपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारखी खरिप पिके पाण्याखाली गेली आहेत. काही दिवसांपूर्वी पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं होतं, पण पाऊस थांबल्याने शेतकर्यांना पिके वाचण्याची आशा होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून पुन्हा आलेल्या जोरदार पावसामुळे ही आशा मावळली आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
शनिवारी (दि.१३) दुपारीही अचानक आलेल्या पावसामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाणी साचलं होतं. १७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. १३ सप्टेंबरच्या अहवालानुसार, परभणी तालुक्यात सिंगणापूर येथे ६५.५ मिमी, पिंगळी ९५ मिमी आणि परभणी ग्रामीण भागात ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा तालुक्यात पूर्णा १३९ मिमी, ताडकळस ९६.३ मिमी आणि कात्नेश्वर १४७.५ मिमी पाऊस झाला आहे. पालम तालुक्यात पालम ७९.८ मिमी, बनवस ७५.८ मिमी आणि पेठशिवणी येथे ८९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.