शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ८ ऑगस्टला राज्यभर निदर्शने
महाराष्ट्र संयुक्त किसान मोर्चाची हाक
परभणी : देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या मागण्या आणि राज्यातील ज्वलंत शेतकरी प्रश्न या दोहोंवर ८ ऑगस्ट २०२४ रोजी “भारत छोडो” दिनी “कॉर्पोरेट भारत छोडो” या घोषणेभोवती राज्यभर जोरदार निदर्शने करण्याची हाक संयुक्त किसान मोर्चा (महाराष्ट्र)च्या कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीने दिली आहे.
सर्वंकष उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव, शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती, पीक विमा योजनेत शेतकरी हिताचे आमूलाग्र बदल, शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन, स्मार्ट मीटर योजना व विजेच्या खाजगीकरणाला विरोध, २०१३च्या भूमी अधिग्रहण कायद्याची तसेच वनाधिकार कायद्याची कसून अमलबजावणी, दुधाला ४० रुपये लिटर मिळवण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा, राज्याच्या १४ जिल्ह्यांत रेशन बंद करण्याचे कारस्थान, ह्या व इतर अनेक ज्वलंत स्थानिक प्रश्नांवर ८ ऑगस्टचे आंदोलन करण्यात येईल. त्यात राज्य सरकारने नुकतेच विधानसभेत मांडलेल्या अत्यंत हुकूमशाही “जनसुरक्षा विधेयका”स कसून विरोध केला जाईल. ८ ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त किसान मोर्चातील सहभागी संघटनांच्या संयुक्त बैठका तातडीने घ्याव्यात असे ठरले. १७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पाणी, सिंचन, दुष्काळ, अतिवृष्टी आदींशी संबंधित समस्या, समन्यायी पाणी वाटप, नैसर्गिक संसाधनांवर जनतेचे नियंत्रण, या प्रश्नांवर जिल्हा पातळीवर परिसंवाद आयोजित करावेत असे ठरले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त किसान मोर्चाने देशभर भाजप आघाडीला धडा शिकवण्याची मोहीम चालविली होती.अलीकडच्या काळात ज्या राज्यांत शेतकरी आंदोलन प्रभावीपणे लढवले गेले अशा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र या पाच राज्यांत भाजप आघाडीचा दणदणीत पराभव झाला. आता महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड व जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यांतही भाजप आघाडीचा दारुण पराभव करण्यासाठी झटण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी वर्गाला केले. या मोहिमेच्या तयारीसाठी २४-२५ ऑगस्ट (शनिवार-रविवार) रोजी एसकेएमची राज्य कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरले. तिचे ठिकाण निश्चित होताच कळवले जाईल. एसकेएमच्या केंद्रीय निर्णयाप्रमाणे १६-१७-१८ जुलै या काळात राज्यसभेचे खासदार श्री. शरद पवार, तसेच दक्षिण मुंबई, धुळे, नंदुरबार, सांगली, सोलापूर, बारामती, नांदेड, वर्धा व इतरत्रच्या लोकसभेच्या खासदारांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राजन क्षीरसागर अध्यक्षस्थानी असलेल्या या बैठकीत त्याच संघटनेचे हिरालाल परदेशी व आत्माराम भिसे, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे व उमेश देशमुख, जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर व संजय मंगला गोपाळ, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सर्वहारा जनआंदोलनाच्या उल्का महाजन, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले व आर.टी.गावीत आणि कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो हे हजर होते.