सेलूतील राष्ट्रीय महामार्ग अंधारात

सेलूतील राष्ट्रीय महामार्ग अंधारात

पथदिवे तत्काळ सुरू करा; अन्यथा जलसमाधी

राष्ट्रीय महामार्ग व नगरपालिकेच्या आडमुठे धोरणामुळे जीव धोक्यात; नागरिकांचे पालिका प्रशासनाला निवेदन 

सेलू : सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ बी वरील पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे अपघात होऊन लोक जखमी होत आहेत. पथदिवे तत्काळ सुरू करा; अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा इशारा नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की; राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनिअरला विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की; आम्ही मागच्या सहा महिन्यांत सेलू नगरपालिकेसोबत पथदिवे सुरू करण्यासाठी व हस्तांतरित करून घेण्यासाठी चार वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे. पण नगरपालिकेकडून काहीही प्रतिसाद अजून मिळाला नाही. यात काय तथ्य आहे ते नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग या दोन कार्यालयालाच माहीत. राष्ट्रीय महामार्ग व नगरपालिका सेलूच्या आडमुठे धोरणामुळे सेलू तालुक्यातील रहिवाशांचा जीव रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे धोक्यात आला आहे व या मार्गावर रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहे; तसेच या मार्गावरून शिकवणीला जाणारी मुले, तरुणी व वाकिंगला जाणारी वयस्कर लोक या सर्वांना दोन्ही विभागाच्या आडमुठे धोरणामुळे धोका निर्माण झाला आहे. तरी येत्या ९ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात यावेत. नसता सेलूवासियांतर्फे मोरेगाव येथील दुधना नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येईल व यात काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग व नगरपालिका सेलू यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी. यावेळी जयसिंग शेळके, नवनाथ गायकवाड, गणेश सोळंके, आण्णासाहेब शिंदे, वैभव कदम, आबासाहेब खरात, मारोती ढोले, महादू नजान आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!