सेलू नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंड
मोरया प्रतिष्ठानचे निवेदन, जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मागणी
सेलू : सेलू शहरातील स्टेशन रोड ते मदरसा (परभणी रोड) या राज्य महामार्ग म्हणून नवीनच तयार झालेल्या मार्गावर वालूर नाका या ठिकाणी नगर परिषद पाणी पुरवठाच्या वतीने जलनलीका जोडण्याचे काम मागील दीड महिन्यापासून सुरु असून आजतागायत ते काम पूर्ण झाले नाही. यासाठी नवीन रस्ता खोदण्यात आला आहे. सेलू नगरपालिकेच्या या गलथान कारभाराचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे हा खर्च जबाबदार अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी, ११ फेब्रुवारीरोजी मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सेलू शहरातील स्टेशन रोड ते मदरसा (परभणी रोड) हा राज्य महामार्ग नुकताच तयार करण्यात आला आहे. या मार्गावर नगर परिषद पाणी पुरवठाच्या वतीने जलनलीका जोडण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन महामार्गाचे नुकसान करण्यात आलेले आहे. या महामार्गाचे काम जेव्हा सुरु होते. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे जलवाहिन्या जोडण्याचे काम झाले नाही. आता नवीन झालेल्या महामार्गाला खोदण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा सेलूतील नागरिकांच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.