अहिल्यादेवींनी राष्ट्रीय व सामाजिक कार्यास प्राधान्य दिले : निलेश गद्रे
स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला
सेलू, दि.२२ : अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या राजकीय कारकीर्दीत सांसारिक जीवनातील वैयक्तिक समस्यां ऐवजी सांस्कृतिक व धार्मिक कार्यातून राष्ट्रीय व सामाजिक दृष्टीकोन जोपासण्याला प्राधान्य दिले, असे मत महाराष्ट्र-गोवा राज्य समरसता मंचचे संयोजक श्री.निलेश गद्रे यांनी येथील स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी अंबाजोगाईच्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डाॅ.हेमंत वैद्य होते. व्यासपीठावर चंद्रकांत मुळे, हरिभाऊ चौधरी व उपेंद्र बेल्लूरकर यांची उपस्थिती होती.
सेलूतील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात २१ फेब्रूवारी रोजी सायंकाळी आयोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालपणापासून साहस व नेतृत्वाचा गुण अंगी असलेल्या अहिल्यादेवींनी माळवा प्रांताचा कारभार स्वीकारल्यानंतर मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्याची मोहीम राबविली.आदर्श व निष्पक्ष न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे नियोजन करीत शेतसारा कमी केला. काशी विश्वेश्वर, सोरटी सोमनाथ, रामेश्वर आदी बारा ज्योतिर्लिंग मंदिरासह मुघलांनी क्षती पोचविलेल्या देशातील मंदिरांचा स्वतःच्या निधीतून जिर्णोद्धार केला. विस्तृत घाट बांधले. सांस्कृतिक व धार्मिक व्यवसूथापनातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अहिल्यादेवीच्या जीवन चित्रातील अनेक साहसी, रोमांचकारी व प्रेरक प्रसंगांचे दाखले देत त्यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला.
व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या सत्राचा प्रारंभ अहिल्यादेवी, स्वामी विवेकानंद व स्व.जनुभाऊ रानडे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांचे हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करून झाले. गौतम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर शंतनू पाठक यांनी अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर ” योगिनी तू, मानिनी तू, तूच साध्वी सोज्वला ” हे पद्य सादर केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ.हेमंत वैद्य यानी स्व.जनुभाऊ रानडे यांच्या सहवासाने स्वतःसह अनेक स्वयंसेवक व प्रचारकांना संघकार्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले. तर उपेंद्र बेल्लूरकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. व्याख्यानास सेलू व परिसरातील सर्व स्तरातून महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.