सुरेश हिवाळे यांच्या ‘भारतीय’ कवितेने जिंकली रसिकांची मने
सेलू : येथील नूतन विद्यालयातील सहशिक्षक कवी सुरेश हिवाळे यांनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर सादर केलेल्या ‘भारतीय’ कवितेने रसिकांच्या काळजाचा ठाव घेत मने जिंकली. सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे संपन्न झाले. साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर सुरेश हिवाळे यांनी रविवार ( दि. २३) रोजी संमेलनातील महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात कवी बा. सी. मर्ढेकर यांना अर्पण केलेल्या काव्य सत्रात ‘ भारतीय ‘ ही कविता सादर केली. सुरेश हिवाळे यांच्या ‘भारतीय’ कवितेतील ” सर्व नागरिक । आधी भारतीय । अंती भारतीय । चिरंतन ॥, नको डावपेच । होऊ नये दंगा। फडको तिरंगा । मनोमनी ॥ ” या ओळींना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कवी कट्ट्याचे संयोजक राजन लाखे आणि मान्यवरांच्या हस्ते सुरेश हिवाळे यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.