पालकमंत्री बोर्डीकर यांच्या ‘जनता दरबार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
६५१ अर्जदारांच्या तक्रारी सादर; जनतेच्या समस्या तत्काळ निराकरण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
परभणी : जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी, २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित “जनता दरबार”ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. तक्रारदारांची समस्या स्वत: पालकमंत्री यांनी जाणून घेत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तक्रारींचे तातडीने निरसन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. एकूण ६५१ अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या. तक्रारदारांना कुठलीही अडचण भासू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते.