गौतम सूर्यवंशी यांना ‘यमुना-गोविंद’ पुरस्कार प्रदान
सेलू तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा उपक्रम
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : येथील सेलू तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्यावतीने नूतन महाविद्यालयातील सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक, ज्येष्ठ कवी तथा लेखक गौतम सूर्यवंशी यांना २०२४-२५ या वर्षाचा ‘यमुना-गोविंद उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार’ सोमवारी, २६ मेरोजी आयोजित असोसिएशनच्या आमसभेच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संस्थापक सदस्य विश्वनाथराव धर्माधिकारी यांच्यावतीने आईवडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. गौरवपत्र, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. असोसिएशनतर्फे वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक उद्बोधन आदी उपक्रमातील सहभाग, सेवाभावी वृत्ती वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.विनायकराव कोठेकर होते. व्यासपीठावर गौतम सूर्यवंशी, आशाताई सूर्यवंशी, नागेश देशपांडे, डाॅ.गंगाधर गळगे, नारायणराव इक्कर, रवि मुळावेकर आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सचिव डाॅ.गंगाधर गळगे यांनी सेवानिवृत्त संघाच्या ध्येय धोरणांची माहिती देत सन २०२४ -२५ वर्षाचा अहवाल सादर केला. तर आर्थिक जमाखर्चाचा अहवाल, ताळेबंद व अंदाजपत्रक सहसचिव नारायणराव इक्कर यांनी सादर केले. सहसचिव रवि मुळावेकर यांनी गौरवपत्राचे वाचन केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ.कोठेकर यांनी सेवानिवृत्त संघाच्या उपक्रमशील वाटचालीचा व कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत श्री.सूर्यवंशी यांच्या सेवाभावी वृत्तीची प्रशंसा केली. नागेश देशपांडे यांनी आभार मानले. आमसभेस पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, महिला, पुरूष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवावृत्ती वर्धित करणारा पुरस्कार : गौतम सूर्यवंशी
सेलूच्या पेन्शनर्स असोसिएशनचा ‘यमुना-गोविंद उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार’ हा सेवा निवृत्तीनंतर सेवावृत्ती वर्धित करणारा पुरस्कार आहे. अशा भावना गौतम सूर्यवंशी यांनी पुरस्काराला उत्तर देतांना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, माझ्या कार्यकर्तृत्वाच्या जडणघडणीत नूतन विद्यालय, महाविद्यालय, पेन्शनर्स असोसिएशनचा मोलाचा वाटा आहे. हा पुरस्कार सेवाभावी वृतीचे दायित्व वाढविणारा आहे. असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत या सेवाकार्यात सभासदांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.सूर्यवंशी यांनी यावेळी केले. त्यांनी सादर केलेल्या औचित्यपूर्ण गीत रचनेला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.