रास्तारोको : रस्त्यासाठी राष्ट्रवादीचे जिंतूर-औढा महामार्गावर आंदोलन
माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
परभणी : जिंतूर ते औंढा नागनाथ महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसह नवीन रस्ता तात्काळ करावा. या मागणीसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत या मार्गावरील भोगाव येथे शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
जिंतूर तालुक्यातून जाणार्या जिंतूर ते औंढा नागनाथ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आय ची दुरवस्था झाली आहे. गेल्या एक वर्षापासून या रस्त्यावर दोन-तीन फुटांचे मोठे-मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे दररोज होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अपघातामुळे बऱ्याच नागरिकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. रस्त्याबाबत वेळोवेळी विचारणा केली असता, अधिकार्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. होणारी वाहतूक व अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व नवीन रस्ता तात्काळ करावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टी व पिकविम्यातून जिंतूर व सेलू दोन्ही तालुके वगळण्यात आले आहेत. महावितरणचे सर्वे कामे बंद आहेत. ग्रामीण भागात बेघर लोकांना घरकुल मिळाले नाहीत. याकडेही लक्ष वेधण्यात आले.
या वेळी बोलतांना माजी आमदार विजयराव भांबळे यांनी सांगितले की, केंद्रात व राज्यात भाजप चे सरकार असून भाजप सरकार रस्त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही. जिंतूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून भाजप च्या विद्यमान आमदार या सदर गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यावर झालेल्या अपघाताचा कलम ३०२ नुसार गुन्हा विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वर दाखल करायचा का असा सवाल उपस्थित केला. तसेच या वर्षी अतिवृष्टीमध्ये जिंतूर व सेलू दोन्ही तालुके वगळण्यात आले. पिकविमामध्येदेखील जिंतूर व सेलू दोन्ही तालुके वगळण्यात आले. महावितरणचे सर्वे कामे बंद आहेत.ग्रामीण भागात बेघर लोकांना घरकुल मिळाले नाहीत. सदर महामार्ग तात्काळ दुरुस्त व नवीन रस्ता न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी प्रसादराव बुधवंत,रामराव उबाळे, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, विजय वाकळे, गणेशराव ईलग, मधुकर भवाळे, प्रकाश शेवाळे, विजय खिस्ते, संतोष भवाळ, प्रकाश शेवाळे, किरण तळेकर, मुंजाभाऊ, तळेकर, शंकर जाधव, बालाजी सांगळे, पिंटू मस्के, हरिभाऊ बुधवंत, संजय निकाळजे, चंद्रकांत बहिरट, शेख इस्माईल, शाहेदबेग मिर्झा, बाळासाहेब देशमुख, अहेमद बागबान, लखुजी जाधव, अनंतराव देशमुख,अन्सीराम पुंड, योगेश देशमुख, विठ्ठल देशमुख, रवी देशमुख, नारायण देशमुख, अंगत देशमुख, सुधाकर मस्के, हकीम लाला,शाहेद सिद्धिकी,खयुम बागबान, शौकत लाला, मकसूद पठाण, आकु लाला, बाळू दाभाडे, बालाजी नव्हाट, सुभाष मोहिते, धर्मा राठोड, पंडित जाधव, विठ्ठल मुटकुळे, श्याम सारंग यांच्यासह अनेक गावातील सरपंच व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.