मराठा आरक्षण : साखळी उपोषणे सुरू; नेत्यांना गावबंदीचे ठराव
परभणी, सेलू, जिंतूर, सोनपेठसह ठिकठिकाणी साखळी उपोषण
सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सकल मराठा समाज बांधवांनी बुधवारी सायंकाळपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. अशोक शेलार, जयसिंग शेळके, प्रसाद महाराज काष्टे, गणेश ढेंगळे, गोविंद शिंदे, शाम जंगले, अनिकेत शिंदे, सचिन चव्हाण, संतोष राऊत यांनी सहभाग घेतला. जयसिंग शेळके, साईराज बोराडे, शक्ती बोराडे, झोल आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.
परभणी : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण दिल्याशिवाय नेत्यांना गावात प्रवेश नाही, असा ठराव परभणी जिल्ह्यातील अनेक गावात घेतला जात आहे, तसेच साखळी जिंतूर, सेलू, सोनपेठसह ठिकठिकाणी साखळी उपोषणही सुरु करण्यात आले आहे.
गावागावाच्या वेशीवरच नेत्यांच्या गावबंदीचे बॅनर झळकत आहेत. सरकाराने मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. शांततेच्या मार्गाने गरजवंत मराठ्यांचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन मराठा आरक्षण देणारच याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर विविध माध्यमांतून जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्या. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या जरांगे पाटील व मराठा समाजाने भूमिकेचे स्वागत केले. आनंदही व्यक्त केला. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच राहील अशी जाहीर भूमिका घेतली आहे. उपोषण सुरू केले आहे
जरांगे पाटील यांच्या भूमिकेला, आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्हाभरातून मोठे समर्थन मिळत आहे. सेलू तालुक्यातील अनेक गावात मराठा तरुणांनी गाव पातळीवर समाजाच्या बैठका घेऊन संवैधानिक पदावर असलेल्या नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेश दिला जाणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. तसेच राजकीय पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहनही विविध सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पक्षाचे कार्यक्रम, सभा रद्द होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, शिराळा, मालेटाकळी, शिंदे टाकळी, रवळगाव, डासाळा, मोरेगाव, झोडगाव, निपाणी टाकळी जवळा जिवाजी, ब्रह्मवाकडी, रायपूर राजवाडी, लाडनांद्रा आदीसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या गावबंदीबाबत ठराव घेण्यात येत आहेत. साखळी उपोषणही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, सेलू् तालुक्यातील रायपूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने २१ सप्टेंबरपासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषणात बुधवारपासून अन्नत्याग साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.