Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर वास्तू नव्हे; देशाचा आत्मसन्मान : सुनील देवधर
सेलूमध्ये स्व.जनुभाऊ रानडे व्याख्यानमाला उत्साहात, स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल व देवगिरी नागरी सहकारी बँकेचा उपक्रम
” जिथे अपमान झाला आहे. त्याच ठिकाणी परिमार्जन होऊ शकते. म्हणूनच विश्व हिंदू परिषदेने ‘ मंदिर वही बनायेंगे’ नारा देत प्रभू श्रीरामचंद्रानांच आश्वासन दिले. या दरम्यान शिलान्यास, कारसेवा, लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, यामुळे जनजागृती झाली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून संपूर्ण देशवासीयांना पुन्हा आत्मसन्मान मिळवून दिला आहे.- सुनील देवधर, राष्ट्रीय नेते भारतीय जनता पक्ष
सेलू जि.परभणी : अयोध्यामध्ये जगातील एकमेव असे प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे मंदिर वास्तू नसून, देशाचा आत्मसन्मान आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
सेलू येथील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात शनिवारी, तीन फेब्रुवारी रोजी आयोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प श्री. देवधर यांनी गुंफले. ‘राममंदिर ते रामराज्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल व देवगिरी नागरी सहकारी बँक यांच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे होते. याप्रसंगी आमदार मेघना बोर्डीकर, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते डॉ.उमेश देशमुख, विवेकानंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री देवधर म्हणाले, ” जिथे अपमान झाला आहे. त्याच ठिकाणी परिमार्जन होऊ शकते. म्हणूनच विश्व हिंदू परिषदेने ‘ मंदिर वही बनायेंगे’ नारा देत प्रभू श्रीरामचंद्रानांच आश्वासन दिले. या दरम्यान शिलान्यास, कारसेवा, लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, यामुळे जनजागृती झाली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी रोजी मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून संपूर्ण देशवासीयांना पुन्हा आत्मसन्मान मिळवून दिला आहे.” अध्यक्षीय भाषणात किशोर शितोळे यांनी जनुभाऊ रानडे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. शालवी सावरगावकर व संचाने स्वागतगीत सादर केले. कल्याणी पाठकने, गौतम सूर्यवंशी रचित ‘विराजे रघुनंदन एकबार’ गीत सादर केले. प्रास्ताविक हरिभाऊ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले, तर श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
♦हार म्हणजे पराजय
आपल्याकडे जिंकलेल्यांना पुष्पहार घालण्याची पद्धत आहे. त्याउलट हारलेल्यांना सांत्वन करण्याची पद्धत आहे.त्यामुळे विशेषतः राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुष्पहार स्वीकारताना,त्यामागील अदृश्य तू हारु शकतो? ही सूचना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विजयाचा हार स्वीकारताना,भविष्यात हार म्हणजे पराजयाला सामोरे न जाण्यासाठी कायम समाजासाठी वाहून घेण्याची भूमिका जपली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणारी मंडळी अगदी घरदार-नातेवाईक यांना सोडून, देश-धर्म व समाजासाठी सतत काम करत असतात यावेळी ते हाराची अपेक्षा न ठेवता काम करत असल्याने त्यांच्या जीवनात हार म्हणजे पराजय येत नाही, असे सुनील देवधर यांनी यावेळी स्पष्ट केले.