फुलांसारखे सुगंधी होतांना…
वर्तमानपत्र वाटप्या ते दिग्दर्शक : ‘नूतन’चा माजी विद्यार्थी दिगंबर सुधाकर फासाटे यांचा प्रेरक प्रवास
कलर्स मराठी वाहिनीवरील वरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या मालिकेच्या मुख्य दिग्दर्शकाची भूमिका लिलया पेलणार्या दिगंबर सुधाकर फासाटे यांचा प्रवास खडतर, संघर्षशील पण तितकाचा प्रेरक आणि लाजवाब म्हणता येईल, असाच आहे. ” आपल्या लाडक्या मालिकेचा, मी तुमचा लाडका दिग्दर्शक “दिगंबर सुधाकर फासाटे.” अशी ओळख करून देतांना दिगंबर यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास हा आत्मशक्तीचा, स्वयंप्रेरणेचा अनुभव देऊन जातो.
दिगंबर सुधाकर फासाटे मूळचे पाथरी तालुक्यातील डोंगरगावचे. लहानशा खेडेगावचे. गावात पहिली ते सातवीपर्यंतच शाळा. पण घरच्यांनी दिगंबरला सेलूला नूतून विद्यालय या अतिशय शिस्तबद्ध शाळेत प्रवेश देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शाळेतील परिपाठात नित्य नियमाने बडबड गीत सादर करायची दिगंबरला भारी ओढ. मग काय, बडबडगीते सादरीकरण हा दिगंबरचा पहिला वाहिला परफॉर्मन्स ठरला. पुढे आजीने सांगितलेल्या गोष्टीतील ‘बरीखाती’ गोष्ट दिगंबरने शाळेच्या स्नेहसंमेलनातील कथाकथन स्पर्धेत सादर केली. आणि पहिला नंबर पटकावला. मग काय कोणत्याही स्पर्धा आल्या की, दिगंबरने शिक्षणासोबतच विविध स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. क्रीडा स्पर्धेतही मागे नव्हता. हॉलीबॉल, बेसबॉल अशा विविध खेळात भाग घ्यायचा. आणि राज्यपातळीवरील स्पर्धेपर्यत खेळायची संधी मिळवायचा.
आपल्या प्रवासाबद्दल दिगंबर सांगतोय…
मी खेळलो. भरपूर खेळलो. अभ्यासात लक्ष कमी झाले. पण फार नाही. दहावीला नापास झालो असतो. आणि शेती केली असती. पण, तशी वेळ आली नाही, कारण मला राज्यपातळीवर खेळल्यामुळे बोर्डाचे २५ गुण अधिकचे मिळाले आणि पास झालो. नंतर पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर ( तेव्हाचे औरंगाबाद) गाठले. सरस्वती महाविद्यालयात नाट्यशास्त्रासाठी प्रवेश घेतला. नाट्यशिक्षण घेतले. डॉ.दिलीप घारे, योगेश सिरसाट आणि रमाकांत भालेराव या शिक्षकांनी नाट्य शिक्षणाचे धडे दिले. परंतु शिक्षण घेतांना खूप आर्थिक त्रास सुरू झाला. कारण एक तर मी औरंगाबादला पळून गेलो होतो आणि मला घरून तसा फारसा सपोर्ट नव्हता. मी नाटकात काम करायचो म्हणून मला सगळे नाच्याचं काम करतो म्हणायचे. खूप वाईट वाटायचे. पण, ठरवले. हेच लोक उद्या मला चांगले काम केले म्हणून नावाजतील. समजतील. यासाठी मी प्रयत्न सोडले नाहीत. मी काम करून माझे शिक्षण करायचो. काम काही कुठल्या ऑफिसच नाही, तर वेल्डींग, फर्निचर, पेंटर, हॉटेलमध्ये चहा देणे, वेटर, वर्तमानपत्र वाटणे, कपड्याच्या दुकानात घड्या घालणे अशी कितीतरी बारीकर सारीक काम करायची मला जरासुद्धा लाज वाटली नाही. कुरिअर टाकणे हे माझे शेवटचे काम. पण मी विचार केला कुरिअरमध्ये काही करिअर नाही.
नंतर मी गावी जाऊन परत शेती केली. कारण माझे वडील हे शेतकरी आहेत. मला शेती करता येते. सगळी काम मला येतात.पण, माझे मन लागत नव्हते. मी कापसामध्ये औत चालवायचो (काही जण वखर म्हणतात) हे करत असतांना मी मोठमोठ्याने नाटकाचे उतारे घायचो. नटसम्राट मधला फेमस डायलॉग ” कुणी घर देत का ? कुणी घर ” असं, मी जोरजोरात म्हणायचो. हे ऐकून आजूबाजूचे शेतातले लोक मला वेडं लागले म्हणायचे. मी मध्येच शेती सोडून मुंबई गाठली. पण आवर्जून सांगावसे वाटते, की मी मुंबईला येताना मला माझ्या वडिलांनी ४० हजार रुपये हे व्याजाने काढून दिले होते. आणि मी मुंबईत येऊन चित्रपट या माझ्यासाठी नवख्याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. कोणीच मार्गदर्शन करायला नव्हते. सगळे नवीन. पहिल्यांदा मी दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये गेलो. तिथे मला प्रवेश नाकारला. तो वॉचमन मला कार्ड मागत होता. मी काहीही मागचा पुढचा विचार न करता, माझे आधारकार्ड काढून त्याला दाखवले. तो खूप चिडला. मला म्हणाला, ” वेडा आहेस का, दिग्दर्शकाचे किंवा कलाकारांचे कार्ड असते, ते दाखवून आत सोडतोय.” पण, हे कार्ड तर माझ्याकडे नव्हतेच. ते कार्ड काढण्यासाठी मी तयार झालो. त्यासाठी मला एकाने पैसे घेऊन फसवलेसुद्धा. पण तरीही काही दिवस मुंबईत घरीच बसून राहिलो. काहीच काम मिळेना.
एके दिवशी सह्याद्री वाहिनीवर एक रियालिटी शो येणार होता. त्याचे ऑडिशेन द्यायला वरळीला गेलो. आणि पहिल्यांदा मी टीव्ही वर दिसलो कलाकार म्हणून मला २००० रूपये मानधन मिळाले. परत काही दिवस घरीच. पैसे संपले. मग वडा पाव जिंदाबाद. खूप वाईट दिवस काढले ते. पुढे माझाच एक सीनियर मित्र सहायक दिग्दर्शक म्हणून ‘ माझे मन, तुझे झाले’ या मालिकेत काम करत होता. त्याने मला तिथे त्याच्या जागी काही दिवस पाठवले. त्याने आजारी पडल्याचे नाटक केले आणि तो मजा मारत फिरायचा महिनाभर. मी त्याच्या जागेवर काम केले. महिन्याचा चेक त्याला आला. पण त्याने मला एकही रूपया नाही दिला. मी परत काही दिवस घरी. मग मला ‘ राधा ही बावरी’ ही झी मराठीवरील मालिका सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मिळाली. तिथे मी चार नंबरचा एडी (साहाय्यक दिग्दर्शक) होतो. आणि मला पहिले पेमेंट पाच हजार रूपये सुरू झाले. पण, माझी भाषा अशुद्ध. म्हणून मला खूप हिणवले गेले. माझा खूप अपमान केला गेला. पण, ठरवले एक दिवस नक्की माझाही येईल. आज जे मला नाव ठेवतायेत. तेच एक दिवस माझ्या हाताखाली काम करतील. आणि तेच आज होतेय. याचा मला कदापि अंहकार चढला नाही.
मी दिग्दर्शक झाल्यावर पण माझ्या समोर सारखे नवनवीन संकटे उभे राहात होतीच. पुढे काम करत राहिलो. काही दिवसांनी माझ्या बहिणीचे लग्न ठरले. आणि माझ्यावर परत गावी येण्याची वेळ आली. असे अधूमधून सतत होत असे. मला माझे नातेवाईक आणि गावचे सगळे म्हणायचे ” तू एकुलता एक. तू शेतीच कर. काय आहे तुला मुंबईत. तुझ्यापेक्षा गावची बाई जास्त कमावते.आणि तुझ्या आई वडिलांचे खूप हाल होतायत.” असे एक ना अनेक प्रश्नांची बरसात माझ्यावर होत असे. पुढे लग्न झाले. पण लग्न झाल्यावर पण तेच. कमी पैशात मी बायकोलाही मुंबईला सोबत आणले. मी एक शो करत असतांना भयंकर आजारी पडलो.आणि मला मुंबई सोडावी लागली. औरंगाबादला आलो आणि ‘आपली आवड भोजनालय’ आणि ‘फक्कड चहा’ हॉटेल चालवली. हॉटेलमध्ये खूप कर्जात बुडालो. मग परत मुंबईला. आणि काही दिवसात लॉकडाऊन पडले. परत गावी यावे लागले. गावी येऊन काहीच काम नव्हते. कंटाळवाणे वाटायला लागले.
असाच एक दिवस गावच्या मित्राला सहज म्हणालो, ‘”तुझ्याकडे एक टपरी आहे. ती मला दे चालवायला.” तो हसला आणि त्याने ती दिली. मी टपरीची डागडुजी केली. ती चालवायला सुरुवात केली. पण माझ्याकडे फारसे पैसे नव्हते. मी एका नातेवाईकाकडून व्याजाने पैसे घेतले. मी पानटपरी चालवायला सुरुवात केली आणि सगळ्यांनीच मला नावे ठेवायला सुरुवात केली. पण मी कुणाचे काही न ऐकता टपरी चालवली. खूप छान वाटले. मी त्याच्यावर पुढचे नऊ महिने घर चालवले. टपरीमध्ये मी गणपती विकले. रांगोळी, फुगे असे अनेकविध प्रकाराचे साहित्य विकले. परत मुंबई गाठली. तोपर्यंत माझ्यावर खूप कर्ज झाले. आणि खूप हाताश झालो. पण आत्मविश्वास नाही ढळला. माणसाने नियमित स्वच्छ मनाने प्रयत्न करायचे ठरवले, तर या जगात अशक्यही शक्य करतील स्वामी. तसे स्वामी धावून आले. स्वामी कृपेने सुरुवात झाली. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही कलर्स वाहिनीवरील एक नंबरच्या सिरीयलचा मुख्य दिग्दर्शक होण्याची संधी मिळाली.
खरी कसरत दिग्दर्शक झाल्यावर सुरू झाली. रोज शुटिंगला जावे लागायचे. आणि असा दिवस आयुष्यात येईल असे कधीच वाटले नाही. तो दिवस म्हणजे माझी आई आजारी पडली. आईला औरंगाबादला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, यांना कॅन्सर झाला. मी मात्र मनातून खूप हादरलो. पण घरच्यांना काही न सांगता पुढे लढत राहिलो. इकडे आईचा आजार वाढत गेला. मी मुंबई-औरंगाबाद-मुंबई अशी वारी करत करत शुटिंग चालू ठेवले. मी आईला डोंगरगाववरून मुंबईला घेऊन गेलो. ज्या दिवशी माझे दिग्दर्शक म्हणून नाव टीव्हीवर झळकले. त्या दिवशी माझी आई माझ्या शुटिंगच्या सेटवर होती. काही दिवसांनी आई देवा घरी गेली. मला खूप जणांनी सांगितले की, तुझे करिअर काही होऊ शकत नाही. तू गावी जा आणि शेती कर. पण माझी जिद्द पक्की होती. सातत्याने काम करत राहिलो.
आयुष्यात खूप काही वेदना आणि खडतर प्रवास करावा लागला. पण यश मिळाले. प्रवास सुखकर झाला. सर्वाना नम्रपणे एकच सांगतो, जर आयुष्यात काहीतरी बनायचे असेल, करून दाखवायचे असेल आणि खूप मोठ्ठं व्हायचे असेल, तर स्वप्न मोठी पाहा. प्रवास खडतर आणि काटेरीच होत असतो. पण, जर ठरवले. प्रामाणिक प्रयत्न केले. जिद्द बाळगली. सातत्याने कठोर परिश्रमाची, पडेल ते काम करण्याची आणि संयमाची तयारी ठेवली, तर काटेरी जीवन प्रवास सुद्धा फुलांसारखा सुगंधी होतो. आतापर्यंत २३ मालिकेत काम करता आले. आणि आता जी मालिका करतोय. ती ‘जय जय स्वामी समर्थ’. ही मालिका महाराष्ट्रभर गाजतेय. या मालिकेचा मी एक अतिशय महत्वाचा भाग आहे. मुख्य दिग्दर्शक आहे. मालिकेचे १०३२ भाग पूर्ण झालेत. बरेच बाकी आहेत. स्वामींच्या अनेक लीला तुम्हाला पाहायला मिळतील. बघत राहा. प्रेम असेच राहु द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे तुम्हाला पडद्यामागील गोष्टी बघायला मिळत नाहीत. नेमके शुटिंग कसे होते. हे बघण्यासाठी यूट्यूबवर digambar fasate Cinematic BTS चॅनेल सुरू केले आहे. यावर टाकलेले व्हिडीओ बघा आणि सबस्क्राईब करा.
– तुमचाच लाडका दिग्दर्शक दिगंबर सुधाकर फासाटे, मुंबई (8652852272)
(शब्दांकन : बाबासाहेब हेलसकर, सेलू जि.परभणी 9881525510)