‘काजळी रोहिणा’ गावचा बदलला चेहरा मोहरा
ग्रामस्थांचा एकोपा, लोकसहभागातून सरकारी योजनांची प्रभावी अमंलबजावणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा आदर्श गावाची सदस्य व गावातील जेष्ठ मंडळीसह प्रत्यक्ष पाहणी केली. तेथून विकासाची प्रेरणा मिळाली. आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी सुशोभिकरण व भूमिगत गटार योजनेसाठी वीस लाखांचा निधी मिळाला. उपसरपंच मुंजाभाऊ काष्टे, सरस्वती काष्टे, सरुबाई काष्टे, सत्यभामा काष्टे, संगीता काष्टे, नामदेव सुतार, ग्रामसेवक राजीव वाव्हळे व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेल्या तीन वर्षांत विविध सरकारी योजनेतील निधीतून तसेच लोकसभागातून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. – अर्चना भारत इंद्रोके, सरपंच, काजळी रोहिणी
सेलू जि. परभणी – सेलू शहरापासून दहा किलोमीटवरील काजळी रोहिणा ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या एकोप्याने सरकारच्या विविध योजनेतून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग प्रभावीपणे केला. गावात वाॅटर फिल्टर, सुंदर स्मशानभूमी, सोलार पथदिवे, चौकाचौकात हायमास्ट दिवे, शंभर टक्के सिमेंट काँक्रिटीचे रस्ते, भूमिगत गटारे, तीन हजार वृक्षलागवडीचा प्रकल्प आदीं विकासकामामुळे गावाचा चहेरा मोहरा बदला आहे. १३५ उंबरे असलेल्या रोहिणा गावात अकराशे लोकवस्ती आहे, सात ग्रामपंचायत सदस्य आहेत. गावाला महामार्गाशी जोणारा रस्ता डांबरी आहे. ग्रामस्थ उत्कृष्ट शेती करतात. मुख्य पीक व भाजी पाल्यातून उत्पन्न काढतात. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी संकल्प करत पाणी, रस्ते, नाली, पथदिवे, स्वच्छता या मूलभूत सुविधेकडे लक्ष घातले. इयत्ता पाचवी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. शाळा व अंगणवाडीला रंगरंगोटी करून प्रत्येक वर्गखोल्याच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. परस बाग फुलवून वृक्षाचे संवर्धन केले. ग्रामस्थांनी छोटे मोठे अतिक्रमण काढून घेत ऐसपैस सिमेंट रस्त्यांसाठी मार्ग मोकळा केला. गल्ली बोळात सिमेंट रस्ते आहेत. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारे करण्यात आले. पेवर ब्लॉक बसविण्यात आले. तसेच सोलर दिवे व चौका चौकात हायमास्ट दिवे गावाच्या सौंदर्यातभर घालतात. जलजीवन मिशन अंतर्गत गावाला पाणी उपलब्ध करून दिले आहे. माफक दरात फिल्टरचे पाणी ग्रामस्थांना मिळते. महिलांना कपडे धुण्यासाठी धोबी घाट उभारण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घनवन प्रकल्पाव्दारे शेकडो वृक्ष लागवड करून संवर्धन केले. विविध विकास कामांमुळे ग्रामस्थ कौतुकास पात्र ठरत आहेत.