वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; विविध शाखेतील ११ हजार जणांना पदवी प्रदान
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. याप्रसंगी विविध विद्याशाखेतील एकूण ११००२ स्नातकांना विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात राज्यपाल बैस म्हणाले, की विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे हवामान बदलास अनुरूप पीक पध्दती विकसित करावी. तसेच कृषी पदवीधरांनी कृषि विकासात आपले योगदान द्यावे. भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ.संजय कुमार यांनी दीक्षांत अभिभाषण केले. स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करतांना म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करित आहे.