सेलू बाजार समितीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी; पाच संचालकांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन
सेलू जि.परभणी : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून चालू असलेल्या गलथान कारभाराची व गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाच संचालकांनी केली आहे. या संदर्भात परभणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांना बुधवारी (२० मार्च) निवेदन देण्यात आले. संचालक ॲड. दत्ता कदम, अनिल पवार तसेच सुरेंद्र तोष्णीवाल, अशोक अंभोरे यावेळी उपस्थित होते. निवेदन म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत मांडलेल्या मुद्यांना तसेच ठरावाला केलेला विरोध प्रोसेडिंगवर घेतला जात नाही. २४ कर्मचारी कायम स्वरूपी असताना २६ हंगामी कर्मचाऱ्याची नियुक्ती दाखवून बोगस नावाने नगदीने पगार दिलेला दाखवला आहे. तो वसुल करण्यात यावा. वारंवार सांगितल्यानंतरही अकाऊंटपे चेकऐवजी बोगस नावे टाकून बेअरर चेकनेच व्यवहार केला जातो. सचिव राजीव वाघ यांनी यापूर्वी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशीत बरेच ठपके ठेवण्यात आहे. परंतु अद्यापपर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही. स्वखर्चाचे पत्रक, प्रोसेसिंग बुक व बँकेचे स्टेटमेंट जप्त करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. रोजनिशी, किर्द ही ३-३ महिने पूर्ण केलेली नसते. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानास मान्यता नाही. ठरावानंतरही वजन काटे व फिल्टर दुरूस्त करण्यात आले नाही. शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण्याची सोय व्हावी ही मागणी सुद्धा प्रोसेडींगवर घेण्यात आली नाही. आदी आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. या संदर्भात सखोल चौकशी करून सचिव व सभापती यांच्यावर नियमाने कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या अपहाराची वसुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संचालक डॉ.संजय रोडगे दत्ता कदम, शैलेश तोष्णीवाल अनिल पवार, रामेश्वर राठी आदींच्या सह्या आहेत.