परभणी लोकसभा : भाजपची ‘चारशे पार’ घोषणा खोटी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा घणाघात
महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल, रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन
बारामती मतदारसंघ सेफ करण्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीकडून महादेव जानकर यांचे पार्सल परभणीत पाठविले असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणी येथील सभेत केला.
परभणी : केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. आणि आताही ‘चारशे पार’ ही खोटी घोषणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सर्वसामान्य मतदार हा प्रयत्न हाणून पाडतील आणि केंद्रात इंडिया आघाडीचे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित सत्तेवर येणार आहे, असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार खासदार संजय जाधव यांनी मंगळवारी, दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने परभणी शहरातून मोठी रॅली काढण्यात आली होती. समारोपप्रसंगी झालेल्या सभेतून दानवे यांनी भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी व राज्यातील महायुतीच्या सरकारवर कडाडून टिका केली. या वेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ.राहुल पाटील, राजेश राठोड, माजी खासदार अॅड.तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार विजय भांबळे, सीताराम घनदाट, सुरेश देशमुख, संतोष सांबरे, सुरेश जेथलिया, अॅड.विजय गव्हाणे, मीराताई रेंगे आदींसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. दानवे म्हणाले, महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा येथून जानकर यांना उमेदवारी बहाल केली होती. परंतु, जानकर यांनी महायुतीतून विशेषतःअजित पवार यांचा नाद करीत परभणी गाठली. अजित पवार बारामतीतसुध्दा यश मिळवू शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकर्यांना सर्वतोपरी मदत केली. परंतु, भाजपच्या सरकारने सामान्य माणसाला यातनाच दिल्या. आज महागाई प्रचंड वाढलेली आहे. शेतकर्यांची सातत्याने दिशाभूल केली जात आहे. भाजपकडून शिवसेनेला कायम सापत्नभावाची वागणूक दिली गेली. विरोधी पक्षातील खासदार, आमदारांना विकासाची कुठलीच कामेच करू दिली गेली नाहीत. परभणीसाठी मंजूर ४५० कोटीची भूमिगत गटार योजना, क्रीडा संकुल, शंभर कोटींचे रस्ते आदी विविध विकास कामांच्या फाईल भाजप सरकारने दडपून ठेवल्या आहेत, असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला. या वेळी आजी-माजी आमदार व खासदारांनी जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार भाषणातून व्यक्त केला. लक्ष्मणराव वडले, डॉ.विवेक नावंदर, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, भगवानराव वाघमारे आदींसह जालना, परभणी जिल्ह्यातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
♦बाळासाहेबांमुळेच मोदी पंतप्रधान
परभणी जिल्ह्यात १९८९ पासून शिवसेना असून आपण मोदींच्या नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारामुळे दोन वेळा खासदार झालो. उलट मोदींना पंतप्रधान होण्याची संधी बाळासाहेबांमुळे मिळाली, असे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी या वेळी सांगितले.