रामराम, आशीर्वाद अन् क्षमा…पंतप्रधान मोदींच्या भावोद्गारांनी परभणीकरांना जिंकले…

रामराम, आशीर्वाद अन् क्षमा…पंतप्रधान मोदींच्या भावोद्गारांनी परभणीकरांना जिंकले…

रामराम, आशीर्वाद अन् क्षमा...पंतप्रधान मोदींच्या भावोद्गारांनी परभणीकरांना जिंकले...

बाबासाहेब हेलसकर…

परभणी : “भारत माता की जय” असा जयजयकार करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ” परभणीकरांना माझा रामराम, संत जनाबाईंच्या या नगरीला आणि देवी प्रभावतीच्या नगरीला माझे कोटी कोटी वंदन…” अशी सुरुवात करताच ‘मोदी, मोदी, मोदी’ असा प्रतिसाद परभणीकरांनी दिला. भरउन्हात सभेला उपस्थित जनसमुदाय आणि बाहेरही अलोट गर्दी उसळल्याचे पाहून पेंडाल कमी पडल्याबद्दल मोदी यांनी उपस्थितांची क्षमा मागितली. पंतप्रधानांच्या या भावोद्गारांनी परभणीकरांना अक्षरशः जिंकून घेतले. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणी येथील पाथरी रस्त्यावरील श्रीलक्ष्मीनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रिपाईंचे नेते रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय बनसोडे, उमेदवार महादेव जानकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, राजेश विटेकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. सभेला उपस्थित जनसमुदायाने “जय श्रीराम, जय श्रीराम मोदीजी को जय श्रीराम” च्या जयघोषात मोदींचे स्वागत केले.
आपल्या अर्ध्यातासाच्या भाषणाच्या प्रारंभीच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराजांना मोदी यांनी अभिवादन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, परभणीच्या भूमीला संत साईबाबांसारख्या अनेक संतांचे चरणस्पर्श झालेले आहेत. यामुळे परभणीचा आशीर्वाद हा ईश्वरीय आशीर्वादपेक्षाही काही कमी नाही. हा पेंडाल कमी पडला आहे. मागे, बाहेरही तळपत्या उन्हात मोठ्या संख्येने लोक उभे आहेत. आमची ही जागा कमी पडली आहे. या बद्दल मी आपणा सर्वांची क्षमा मागतो. मोदी यांनी परभणीच्या भूमीतील संत श्री पाचलेगावकर महाराज यांनी संन्यासी असुनसुद्धा निजामशाहीच्या विरूद्ध संघर्षाचे नेतृत्व केले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेची ही भूमी आहे, असे नमूद केले. आमच्या सरकारने गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ दिला असून परभणी जिल्ह्यातील १२ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मोफत रेशन दिले आहे. आणखी पुढील पाच वर्षे ही योजना चालू ठेवण्यात येईल. याशिवाय परभणीतील वंचित व गोरगरिबांना ४० हजार पक्की घरे, सव्वा लाख महिलांना उज्ज्वला गॅस, नऊ लाखांपेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण केले आहे. गरिबांच्या दु:खाची मला जाणीव आहे. म्हणून जे मी सहन केले, ते देशातील कोणत्याही गरीबांच्या वाट्याला येऊ नये. यासाठीच परिश्रमपूर्वक प्रयत्न आहेत. मराठवाड्याची भूमी शेतकरी, कष्टकऱ्यांची भूमी आहे. कापूस, सोयाबीन,ज्वारी, बाजारी आदीं पिकांचे उत्पादन हे येथील उत्पन्नाचे मोठे साधन आहे. परंतु या पिकांच्या उत्पादन वाढातील समस्यांचा कॉंग्रेस व इंडिया आघाडीने कधी विचार केला नाही. या भागात सिंचनाचे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी एनडीए सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार, मराठवाडा वाटर ग्रीड योजना सुरू करण्यात आली होती. पण आघाडी सरकारने या योजना बंद पाडल्या. परंतु आता राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार सिंचनाचे विविध प्रकल्प वेगाने मार्गी लावीत आहेत. सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प पूर्ण झाला आहे, असे सांगून या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा सामाना करावा लागतो. एनडीए सरकारच्या काळात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे दीड हजार कोटी रुपये दिल्याचे मोदी यांनी नमूद केले. वेलसीड मिशनमुळे परभणीतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. खाद्यतेलामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यामध्येही परभणीचे मोठे योगदान असेल. अमरावतीमध्ये होत असलेल्या टेक्सटाइल पार्कचा परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. श्रीअन्नच्या माध्यमातून या भागातील ज्वारी व बाजरी जगाला पौष्टिक लाभ देणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर व महिला पदाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील महान संत महात्म्यांची एकत्रित प्रतिमा भेट देऊन पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सिमंतिनी कुंडीकर यांनी केले. सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

प्रेम, आशीर्वादाची परतफेड विकासाने करू : भर दुपारी साडेबाराच्या सुमारास मोदी यांच्या सभेला सुरुवात झाली जागा आणि पेंडॉलही कमी पडला. त्यामुळे उन्हात राहून सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधतांना, आपली तपस्या मी वाया जाऊ देणार नाहीत. आपल्या प्रेम आणि आशीर्वादाची परतफेड विकासाच्या माध्यमातून केली जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला दिला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!