PM Narendra Modi / Parbhani Loksabha : केवळ सरकार स्थापनेसाठीची नव्हे, तर विकसित भारताचे लक्ष्य गाठण्याची निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभेला तुफान गर्दी
बाबासाहेब हेलसकर, परभणी : २०२४ च्या लोकसभा निवडणुका या केवळ सरकार बनवावे यापुरत्या मर्यादित नाहीत. या निवडणुकीतील मुद्देसुध्दा सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक पाऊल आणि संकल्प महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळात भारताला विकसित, आत्मनिर्भर राष्ट्र आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविणे हेच एकमेव लक्ष्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी येथील प्रचारसभेत शनिवारी (२० एप्रिल) स्पष्ट केले. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ शनिवारी (२० एप्रिल) दुपारी परभणी येथील पाथरी रस्त्यावरील श्रीलक्ष्मीनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य प्रचारसभा झाली. सभेला तुफान गर्दी उसळली होती.
या वेळी आपल्या अर्ध्यातासाच्या भाषणात मोदी यांनी इंडिया आघाडीच्या धोरण व भूमिकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच गेल्या दहा वर्षांमध्ये एनडीए सरकारच्या काळात देशभरात तसेच परभणी जिल्ह्यात विविध योजनांचा सर्वसामान्यांना लाभ झाल्याचे सांगितले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, रिपाईंचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय बनसोडे, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार विक्रम काळे आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, की आपण चांद्रयान यशस्वी केले. आता १४० कोटी जनता गगनयानची सफलता पाहणार आहे. सैन्य दलास स्वदेशी शस्त्रास्त्राचा पुरवठा, कोरोनासारख्या आपत्तीत औषध निर्मिती हे आत्मनिर्भर भारताचे प्रतिक आहे. जगभर या विषयीच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे, असे नमूद करून विकासाचा मोठा पल्ला आपणास गाठावयाचा आहे. त्यासाठी या निवडणुका अत्यंत महत्वपूर्ण आहेत, असे मोदी म्हणाले. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, सारख्या मुद्यांवर चर्चा होत होती. पाच वर्षानंतर २०१९ च्या निवडणुकीत या चर्चा थांबल्या गेल्या. त्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक सारख्या मुद्याचे देशवासीयांना परिवर्तन दिसून आले. एनडीए सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ हाच मूलमंत्र जपला. कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा विचार न करता, कोणताही भेदभाव न करता सरकार सर्वांच्या विकासासाठी काम करत आहे, असे मोदी यांनी नमूद केले. पाच वर्षांचे संकल्प पत्र हेच मोदींचे गॅरंटी कार्ड असल्याचे सांगून गरिबांना तीन कोटी घरे, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारासाठीचा आयुष्मान भारत योजनेतून खर्च, २० लाख रुपयांपर्यंत मुद्रा लोन आदींसह विविध विकासाची गॅरंटी दिली असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यातील संतांच्या प्रतिमा देऊन पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. माजी खासदार सुरेश जाधव, मोहन फड, डॉ.मधुसुदन केंद्रे, संजय केणेकर, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, आनंद भरोसे, संतोष मुरकुटे, डॉ.विद्या चौधरी,राजेश देशमुख, डॉ.केदार खटींग, राहुल लोणीकर, मीना परताणी, प्रियंका खडके आदींची उपस्थिती होती. भर उन्हात सभेला महिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती. सिमंतिनी कुंडीकर यांनी सूत्रसंचालन केले.
▪️मराठवाड्याचे चित्र नक्की बदलेल
मराठवाड्यातील आधुनिक पायाभूत सुविधांवर एनडीए सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. अमृत भारत रेल्वे स्थानके, मनमाड-नांदेड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, जालन्यातील २५० एकरमध्ये ड्राय पोर्ट प्रकल्प आदींसह आगामी काळातही विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याचे चित्र नक्की बदलणार आहे. असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून दिला.
▪️आधी मतदान; मगच जलपान
घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक ज्येष्ठांना माझा नमस्कार सांगावा. आपला आशीर्वाद हीच माझी उर्जा आहे. जी आत्मनिर्भर राष्ट्र निर्माण करण्यासाठी मला उपयोगी ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळी नमूद केले. ” महादेव जानकर माझा लहान भाऊ आहे” असे म्हणत हातात जानकरांचे चिन्ह ” शिट्टी” घेतली व जानकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. “आधी मतदान, मगच जलपान” असा संकल्प करीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेतून केले.
जानकर म्हणजे खजिन्याची किल्ली – या वेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ” महादेव जानकर म्हणजे महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली आहेत. मुख्यमंत्र्यांसह आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री जानकर यांचा एक शब्दसुध्दा टाळू शकत नाहीत, जानकर दिल्लीतसुध्दा मोदीजींचा विश्वास कमवतील आणि दिल्लीच्या खजिन्याची किल्लीसुध्दा प्राप्त करतील. तर महायुती राज्यघटना बदलवू इच्छित आहे, अशी आरोळी विरोधकांनी ठोकली आहे. परंतु, भारतीय राज्यघटना नव्हे; तर विरोधकांची इंडिया आघाडीच पूर्णतः धोक्यात आली आहे, अशी टीका रिपाइंचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या वेळी केली.