व्यवहार ठप्प : बँका, एटीएममध्ये रोकडचा खडखडाट
परभणी जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार खोळंबले; ग्राहकांतून तीव्र संताप
परभणीसह जिल्ह्यातील अनेक बॅंकांमध्ये रोकड मिळत नाही. यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याप्रकरणी निवडणूक पथकाने तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. – राजन क्षीरसागर, उमेदवार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, परभणी
परभणी : जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्यशाखांसह एटीएममध्ये मागील आठ-दहा दिवसांपासून रोकडचा खडखडाट निर्माण झाला आहे. रक्कमच नसल्यामुळे जिल्ह्यातील अन्य बँकामध्ये देखील पैसा उपलब्ध होत नाही. दिवसभर बँकेत थांबूनही ग्राहकांना रोकड मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील नागरी सहकारी, पतसंस्था, जिल्हा बँकांसह सर्वच बँक शाखांमध्ये पैशांअभावी खडखडाट निर्माण झाला आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने आवश्यक कामे आणि दैनंदिन व्यवहार खोळंबले आहेत. मागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेमध्ये पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे अन्य बँकांना देखील रोख रक्कम पुरविणे बंद झाले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. भारतीय स्टेट बँकेत पैसा आल्यानंतरच इतर बँका व ठिकठिकाणच्या एटीएममध्ये भरण्यासाठी पाठवला जातो. हा पैसा पतसंस्थामध्ये वितरित केला जातो. भारतीय स्टेट बँकेतच पैसा नसल्याने इतर बँकात पैसा पुरवला गेला नाही. एटीएमदेखील बंद पडलेले आहेत. ऐन सणासुदीच्या व लग्नसराईच्या काळात खरेदीसाठी ग्राहकांना रोख रक्कम मोठ्या प्रमाणावर लागत आहे. मात्र, पुरेशी रोख रक्कमही मिळत नसल्याने अनेकांना उधारउसनवारी करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांंनी मध्यस्थी करावी अशी मागणीही ग्राहकांकडून केली जात आहे.