पसायदान : माणसाने वेगळेपणाची व्याप्ती वाढवावी : श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर
सेलूतील वसंत प्रतिष्ठानची प्रवचनमाला, श्रोत्यांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : सेलू येथील वसंत प्रतिष्ठानच्या ‘पसायदान’ या तीन दिवसीय प्रवचनमालेला मंगळवारी (२३ एप्रिल) सायंकाळी सुरुवात झाली. या वेळी पसायदानावरील चिंतन मांडतांना श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की; आपण वेगळे आहोत हे माणसाने दाखवावे, पण वेगळेपणाची व्याप्ती वाढवावी.
येथील श्री साईबाबा मंदिरात सायंकाळी सात वाजता प्रवचनमालेला सुरूवात झाली. प्रारंभी माजी नगराध्यक्ष ॲड.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमापूजनानंतर महेशराव खारकर व ॲड.उमेशराव खारकर यांनी सद्गुरू पूजन केले. महाराजांचा सत्कार केला. गुरुमाऊली मुक्ती प्रिया चैतन्य महाराज देगलूरकर यांचे पूजन वसुधा खारकर व मधुरा खारकर यांनी केले. ” वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भुमंडळी भेटतो या भुता ” या ओळीचे निरूपण करतांना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पसायायदानात सकळ मानवाच्या आनंदासाठी मागणे मागितले आहे. अलौकिक होण्यासाठी आधी लौकिक होणे महत्त्वाचे आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदानात अलौकिक मागणे मागितले आहे. संपूर्ण पसायदानात बहुतांश मागण्या या साधन स्वरूपात आहेत. कष्टानं मिळवलेलं मूल्य कायम राहत. पसायदानात ज्ञानेश्वरांनी पसायदानात साध्याची मागणी न करता, साधनांची मागणी केली आहे. विकसित मानवी जीवन विचारांच्या प्रगल्भतेवर ठरत असते. पसायदान जर आपण म्हणत असू, तर त्याप्रती आपली काही जबाबदारी आहे, हेही मानवाने लक्षात ठेवायला हवे. सामाजिक स्वास्थ्य टीकायचे असेल, तर त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच उत्तरदायित्व हे देखील तितकेच महत्वाचे आहे. सर्व समाजात पसायदान रुजाव आणि सर्व समाज सुखी व्हावा, यासाठी संत ज्ञानेश्वर यांनी पसायदानातून मागणी केली आहे. संत वारंवार भेटत राहिले, तर खळाचं खळत्व निघून जात. समाजातील भूतमात्रांना संतांनी अनवरत भेटत राहिले पाहिजे. संत संगती मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवते असेही देगलूरकर महाराजांनी सांगितले. प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले. गायक सखाराम उमरीकर यांनी अभंग सादर केला. तबला शिवाजी पाठक, हार्मोनियम शंतनू पाठक, मृदंग केदार तांबट आदींनी साथ दिली. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. पसायदाने सांगता झाली. बुधवारी व गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता प्रवचनमाला आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.