परभणी लोकसभा : मतदारसंघात सरासरी ६१.०७ टक्के मतदान; उन्हाच्या तडाख्यातही ग्रामीणभागातून उत्स्फूर्त मतदान

परभणी लोकसभा : मतदारसंघात सरासरी ६१.०७ टक्के मतदान; उन्हाच्या तडाख्यातही ग्रामीणभागातून उत्स्फूर्त मतदान

काही केंद्रावर सायंकाळी उशीरापर्यंत मतदान, ३४ उमेदवारांचे भवितव्य यंत्र बंद

परभणी लोकसभा : उन्हाच्या तीव्रतेचा तडाखा; तरीही ग्रामीणभागातून उत्स्फूर्त मतदान
परभणी शहरातील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या.

परभणी लोकसभा मतदारासंघात सरासरी ६१.०७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी दिली आहे‌. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची अंतिम आकेडवारी अशी : परभणी – ६२.३२ टक्के, घनसावंगी-६०.०९, गंगाखेड ६२.०२, परतूर- ५९.४२, पाथरी ६३.४४, जिंतूर ५९.२० टक्के

बाबासाहेब हेलसकर, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (२६ एप्रिल) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. रखरखत्या उन्हाचा पारा, शहरीभागात पोलचिट अभावी मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांची होणारी धावपळ, एकाच कुटुंबातील मतदारांचे फाटाफूट, सुशिक्षित मतदारांची उदासनिता, लग्नसराई आदींचा मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आल्याचे चित्र होते. या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारसंघात सायंकाळी पाचवाजेपर्यंत सरासरी ५३.७९ टक्के मतदान झाले. प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्षांसह एकूण ३४ उमेदवारांचे भवितव्य यंत्र बंद झाले आहे. दरम्यान, काही मतदान केंद्रावर सायंकाळी उशीरापर्यंत मतदान सुरू होते. दरम्यान मतदानाची अंतिम टक्केवारी ६१.०७ टक्के एवढी असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने रात्री सव्वा अकरा वाजता कळविण्यात आले आहे.

मतदानाच्या अनुषंगाने प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शहरासह ग्रामीण भागातही मतदानकेंद्राबाहेर पेंडॉल टाकले होते. मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी सहकार्य केले जाते होते. याच सोबत मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी ऑटो रिक्षासह, चारचाकी वाहनांची सोय  केल्याचे दिसून आले. मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. परंतु आठ वाजेपर्यंत केंद्रावर तुरळक गर्दी दिसून आली. आठ वाजेनंतर मतदान केंद्रावर रांगा दिसू लागल्या. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदार सरासरी ९.८२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी अकरा वाजेपर्यंत २१.७७ टक्के मतदान झाले. परभणीमध्ये तापमानाच पारा ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. उन्हाचा पारा वाढल्याने मतदार हैराण झाले होते. त्यामुळे मतांचा टक्का दुपारी एक वाजेपर्यंत ३३.८८ टक्के, तर तीन वाजेपर्यंत ४४.४९ टक्क्यापर्यंत गेला. पुढील दोन तासांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.७९ टक्के एवढे मतदान झाले. तर सायंकाळी पाचनंतर शहरी व ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान अधिकार्‍यांनी सायंकाळी सहा वाजता केंद्रांतर्गत मतदारांना आत घेऊन मतदान प्रक्रिया पूर्ण केली.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ९५ जिंतूर विधानसभा मतदारसंघात सरासरी ५१ टक्के, ९६ परभणी ५५.१२ टक्के, ९७ गंगाखेड ५३.५०, ९८ पाथरी ५६.८४, ९९ परतूर ५२.८२, तर १०० घनसावंगी विधानसभा मतदारसंघांत सरासरी ५३.३५ टक्के मतदान झाले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव, महायुतीचे उमेदवार राष्टीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डख यांच्यासह पक्ष, अपक्ष उमेदवारांनी मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच खासदार डॉ.फौजिया खान, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार विजय भांबळे, रामप्रसाद बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह महाविकास आघाडी व महायुतीतील आजी, माजी खासदार, आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांनीही शहरीभागासह ग्रामीण भागातील मतदान केंद्राना भेटी दिल्या. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांनीही विविध केंद्राना भेटी दिल्या.

बलसा ग्रामस्थांचा बहिष्कार मागे; सायंकाळी उशीरापर्यंत मतदान

परभणी तालुक्यातील बलसा गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी शुक्रवारी (२६ एप्रिल) ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सकाळपासूनच एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही. दुपारी बारा वाजेपर्यंत एकसुद्धा मतदान झाले नव्हते. दरम्यान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला. दुपारनंतर मतदार केंद्रावर मतदानासाठी येणे सुरू झाले. सायंकाळी उशीरापर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!