पसायदान : विचार आणि आंतरिक परिवर्तनासाठी सत्संगती महत्त्वाची : चैतन्य महाराज देगलूरकर
सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या प्रवचनमालेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू जि.परभणी : संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखिल विश्वातील प्राणीमात्र अणि मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी पसायदानरूपी अजरामर प्रार्थना केली आहे. माणसाच्या विचारांच्या आणि आंतरिक परिवर्तनाला वेग आणि व्यापकता यायची असेल, तर संतसंगती खूप महत्त्वाची आहे. म्हणून माऊली संत ज्ञानेश्वर महाराज प्रत्येकाकडून सत् म्हणजेच संत संगतीची अपेक्षा करतात, असे असे मत चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
सेलू येथील वसंत प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय पसायदान प्रवचनमालेचा समारोप गुरुवारी (२५ एप्रिल ) झाला. यामध्ये पसायदानावरील चिंतन मांडताना देगलूरकर महाराज म्हणाले की, ज्या कार्यासाठी मनुष्य जन्माला आला; ते कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सुख व समाधान मिळणे आवश्यक आहे. विचारातून निर्माण झालेल्या सुख आणि समाधानाची प्राप्ती चिरकाळ टिकते. जीवाला परिपूर्ण होण्यासाठी सत्संगती खूप आवश्यक आहे. माणसाचे जीवन परिवर्तनशील आहे. माणसाच्या विचारांच्या आणि आंतरिक परिवर्तनाला वेग आणि व्यापकता यायची असेल, तर संतसंगती खूप महत्त्वाची आहे. म्हणून माऊली संत ज्ञानेश्वर महाराज प्रत्येकाकडून सत् म्हणजेच संत संगतीची अपेक्षा करतात, असेही यावेळी चैतन्य महाराज देगलूरकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संयोजक तथा उद्योजक महेश खारकर, ॲड.उमेश खारकर, वसुधा खारकर, जयप्रकाश बिहाणी, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, मधुरा खारकर, प्राध्यापक संजय पिंपळगावकर, सखाराम उमरीकर, शिवाजी पाठक, शंतनू पाठक, केदार तांबट, वाल्मीक दराडे यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.