महाराष्ट्र दिन : चौफेर प्रगतीसाठी प्रयत्न करूया : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे; परभणीमध्ये मुख्य ध्वजारोहण उत्साहात
परभणी : महाराष्ट्र राज्याने स्थापनेपासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये विकासात मोठी भरारी घेत उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. या प्रगतीमध्ये जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले असून, राज्यासह परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी (१ मे) येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.गावडे बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, संगीता चव्हाण, जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गिते, कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
परभणी जिल्हा प्रशासनाने नुकतीच लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया कायदा सुव्यवस्था राखत शांततेत यशस्वीरित्या पार पाडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी चांगले काम केले. इतर मतदार संघाच्या तुलनेत आपल्या मतदार संघातील मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिल्याने ६२.२६ टक्के मतदान झाले,असे जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी सांगितले.
दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
गतवर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करुन आवश्यक त्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीटंचाई आहे, मात्र जूनपर्यंत पुरेल एवढा चारा व पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्हा प्रशासन दुष्काळसदृष्य परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असून, पावसाळा येईलपर्यंत पुरतील अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ४५० हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या शेती पिकांचे पंचनामे प्रक्रिया सुरु आहेत. तसेच वीज पडून २ नागरिक, तर २९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू झाला असून त्यांना मदत वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी आयोजित रिल्स स्पर्धा, गुढी मतदानाची या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील पोलीस पथकाच्या विविध परेड कमांडर यांनी पथसंचलन करत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना मानवंदना दिली.