नव्या पिढीत सामाजिक भान रुजावे : अशोक देशमाने; सेलूतील ‘नूतन’च्या प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन

नव्या पिढीत सामाजिक भान रुजावे : अशोक देशमाने; सेलूतील ‘नूतन’च्या प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन

प्रतिनिधी, सेलू : चंगळवादाकडे आकृष्ट होणाऱ्या नव्या पिढीत सामाजिक भान रुजवणे गरजेचे आहे. हे काम नूतन महाविद्यालय आणि त्यांचा प्रेरणा वार्षिकांक करत आहे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन ‘स्नेहवन’ संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने यांनी केले.
नूतन महाविद्यालयाच्या नूतन महाविद्यालयाच्या २०२३-२४ च्या ‘प्रेरणा- समाजसुधारक विशेषांका’चा प्रकाशन सोहळा बुधवारी (एक मे) झाला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून देशमाने बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया होते. सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, पर्यवेक्षक प्राध्यापक पी.एस.सोनवणे, डी.एच.जामगे व प्रेरणाचे संपादक मंडळाची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘स्नेहवन’ या संस्थेच्या स्थापनेविषयी बोलताना श्री देशमाने यांनी सांगितले की; मराठवाडा हा दुष्काळग्रस्त असल्याने येथील अनेक शेतकरी आत्महत्या करतात. त्यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहतो; हे लक्षात घेऊन २०१५ या वर्षी १८ मुलांच्या जबाबदारीसह ‘स्नेहवन’ या संस्थेची सुरुवात झाली. आज १८० वंचित, अनाथ मुले पुण्यात उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. याकामी समाजातील दानशूर आणि सेवाभावी लोक पुढे आले. ज्यामुळे स्नेहवन या रोपट्याचे आज हळूहळू वृक्षात रूपांतर होत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी, पगार, पैसा एवढ्या पुरते मर्यादित न राहता आपण समाजाचे देणे लागतो यासाठी कार्य केले पाहिजे. आपल्याकडे होऊन गेलेल्या समाजसुधारकांनी घालून दिलेला आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करण्याचे आवाहन देशमाने यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उत्तम राठोड यांनी केले. डॉ.राजाराम झोडगे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. दत्तराव पावडे नाना यांनी आपल्या मनोगतात संस्थेची वाटचाल विशद केली. अध्यक्षीय भाषणात डॉ.एस.एम. लोया यांनी प्रेरणा वार्षिकांकाच्या संपादक मंडळाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी समाजसुधारकांचे विचार केवळ ऐकून, वाचून न थांबता त्याप्रमाणे कृती करून आपले सामाजिक भान जपले पाहिजे, असे नमूद केले. सूत्रसंचालन डॉ.अर्चना पत्की यांनी केले. प्रा.हेमचंद्र हडसणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास नूतन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार, सेवानिवृत्त कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!