‘निम्नदुधना’मध्ये अवघे सहा दलघमी पाणी; अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट 

‘निम्नदुधना’मध्ये अवघे सहा दलघमी पाणी; अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट  

धरणामध्ये सध्या मंगळवारी, सात मेरोजी ६.३४० दलघमी (२.६२ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू, परतूर, मंठा नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत परतूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी दिले जाते‌. पाणी पुरवठा योजनांच्या धरणक्षेत्रातील विहीरी उघड्या पडल्या, तर संबंधित प्रशासनाला पाण्याजवळ चर खोदून विहीरीत पाण्याचा उपसा करावा लागेल. – बाळासाहेब मार्गे, शाखा अभियंता, निम्न दुधना सिंचन प्रकल्प 


बाबासाहेब हेलसकर

सेलू् (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणाने तळ गाठला आहे. मंगळवारी, सात मेरोजी केवळ ६.३४० दलघमी (२.६२ टक्के) इतकाच जिवंत जलसाठा उपलब्ध असून बाष्पीभवनामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. यामुळे पाण्यासाठी धरणावर अवलंबून असणार्‍या सेलू, मंठा, परतूर शहरांसह अनेक गावांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.‌‌

जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना धरणामध्ये वेगाने पाणीसाठा होतो. २०२२ मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती. मात्र, धरणामध्ये शंभर टक्के जलसाठा केल्यानंतर असंपादित जमिनीवरील पिकांचे नुकसान होत होते. त्यावेळी गोदावरी महामंडळाच्या निर्णयानुसार धरणामध्ये ७५ टक्केच पाणी ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांना कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. धरणातून दररोज जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा शहर नगरपालिका पाणी योजनांसह परतूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वॉटर ग्रीड योजनेतील सुमारे दीडशे गावांना तसेच परभणी जिल्ह्यातील सेलू शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाणी घेतले जाते. त्यामुळे धरणामधील पाणीपातळी कमी झाली होती. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला नाही. बाष्पीभवन व पाणी योजनांसाठी पाणी यामुळे धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. पाच वर्षांनंतर प्रकल्पातील पाणीपातळीने या वर्षी निच्चांक गाठला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना

धरणातील पाणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने सेलू, मंठा, परतूर शहरासह अनेक गावांवर पाणी टंचाईचेही संकट निर्माण झाले आहे. पाणी पातळी कमी झाल्याने धरणात ठिकठिकाणी जमीनक्षेत्र उघडे पडले आहे.‌ तर धरणाच्या सुमारे ४० किलोमीटर परीघातील भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे विहीरी व कुपनलिकाचे पाणीही आटत चालले आहेत. पाऊस वेळेवर झाला नाही तर, पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

मासेमारी व्यवसाय संकटात

निम्न दुधना धरणातील गोड्या पाण्यामध्ये कथला, मरळ, वाम आदी जातीचे मासे आढळतात. त्यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणारी शेकडो कुटुंबे धरणाजवळ आहेत. मुंबई, ठाणे, दिल्ली, कोलकाता, हावडा आदी महानगरात रेल्वेने निर्यात केले जातात. परंतु धरणात पाणी नसल्याने मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कुटुंबेही स्थलांतरित होत आहेत.‌ शासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच मासेमारीची निविदा काढतांना मच्छिमारांना सवलत द्यावी अशी मागणी होत आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५६७ हेक्टर भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर असंपादित जमिनीवर पाणी साचून २०१० पासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.‌ अखेर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जून २०२२ पासून साठवण क्षमता ७५ टक्केच ठेवण्यात आली. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला.‌ अन्यथा आजमितीला धरणामध्ये २८ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला असता आणि किमान पाणी टंचाईची समस्या दूर झाली असते. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भूसंपादनाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. – रामेश्वर गाडेकर, उपाध्यक्ष, बळीराजा संघर्ष समिती, सेलू जि.परभणी

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!