रासायनिक खतांची भाववाढ रद्द करा : सेलू तालुका दबाव गटाची मागणी
सेलू जि.परभणी : सध्या सगळीकडे खतांच्या किंमती वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतांना रासायनिक खतांची भाववाढ ही शेतकऱ्यांना धसका देणारी आहे. त्यामुळे तातडीने ही भाववाढ रद्द करण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने सोमवारी, सहा मेरोजी कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की; आधीच अपूरा पाऊस तर कधी अवकाळी पाऊस याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे. त्यात पुन्हा शेतमालाला भाव नाही. चोहोबाजूने शेतकरी पिळून काढला जात आहे. त्यात आता पुन्हा रासायनिक खतांच्या किंमतीत विनाकारण भरमसाठ वाढ करण्यात आल्याच्या बातम्या सातत्याने चालू आहेत. त्यात दिसणारी भाववाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे. शासनास व खत, औषधी कंपन्यांना शेती व्यवसाय बंद करायचा की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे तसेच खरीप हंगामापूर्वी ही केलेली भाववाढ तात्काळ रद्द करण्यात यावी. त्याच प्रमाणे पूर्वीच्याच दरात खरीप हंगामात पुरेसा व दर्जेदार खत, औषधी पुरवठा करण्याबाबत सक्त सूचना कृषी विभाग जिल्हा परिषद यांना देण्यात यावी. बोगस अप्रमाणित खते, बियाणे व औषधी पुरवठा करण्याऱ्या कंपन्या व विक्री करणारे व्यापारी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ॲड.श्रीकांत वाईकर ॲड.टी.ए.चव्हाण, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, आबासाहेब भुजबळ, गुलाबराव पौळ, रामचंद्र कांबळे, दत्ता कांगणे, सतीश काकडे, लक्ष्मण प्रधान, भारत रवंदळे, लिंबाजी कलाल, जलाल भाई, चिंतामण दौंड, रामचंद्र आघाव, दिलीप मगर, महादेव लोंढे, मुकुंद टेकाळे, उध्दव सोळंके, नारायण पवार,अजित मंडलीक, राजेंद्र केवारे, दिलीप शेवाळे, रौफ भाई, शेख मतिन दादामिया, चंद्रकांत चौधरी, ॲड.उमेश काष्टे, ॲड.योगेश सूर्यवंशी, पांडुरंग आवटी, परमेश्वर कादे, प्रमोद वीर, डॉ. गणेश थोरे, ॲड.देवराव दळवे, उत्तम गवारे, गणेश सोळंके, विलास रोडगे, दत्ता गायके, गणपत मिटकरी आदींची नावे निवेदनात आहेत.