आंतरभारती चळवळ गतिमान करण्याची गरज : महादेव आगजाळ; सेलूमध्ये ७७ वा आंतरभारती दिन उत्साहात
या वर्षी गोवा येथील बालभारती शाळा संकुल रायबंदर येथे शुक्रवारी, १० मे रोजी राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, कार्याध्यक्ष अमर हबीब, उपाध्यक्ष संगीता देशमुख, सचिव डॉ.डी.एस.कोरे, कोषाध्यक्ष डॉ.उमाकांत चनशेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आंतरभारती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले; तसेच भारत दर्शन अंतर्गत ९ दिवसांच्या गोवा व कोकण दर्शनमध्ये १५० वर सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
सेलू जि.परभणी : पूज्य साने गुरूजींच्या कल्पनेतून साकार झालेली आंतरभारती ट्रस्ट संस्था माणसामाणसातील धर्म, जात, भाषा, प्रांत अशा अनेक भिंती पाडून एकमेकांची मने जोडणारी चळवळ आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरभारती चळवळ तळागाळापर्यंत अधिक गतिमान करणे नितांत गरजेचे आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल तथा आंतरभारतीचे कार्यकर्ते महादेव आगजाळ यांनी व्यक्त केले.
सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आंतरभारती ट्रस्ट शाखेच्या वतीने शुक्रवारी, १० मे रोजी ७७ वा आंतरभारती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ.शरद ठाकर, संयोजक बाबासाहेब हेलसकर, सुभाष मोहकरे, सच्चिदानंद डाखोरे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, पंडितराव जगाडे, विलास शिंदे, प्रमोद देशमुख, सदाशिव महाजन, भगवान पावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी आंतरभारतीच्या कार्याविषयी माहिती दिली. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वांना खुले व्हावे, यासाठी साने गुरुजींनी १ ते १० मे १९४७ या कालावधीत उपवास केला होता. १० मे रोजी मंदिर खुले झाले. हा दिवस आंतरभारती दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी गोवा येथील बालभारती शाळा संकुल रायबंदर येथे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, कार्याध्यक्ष अमर हबीब, उपाध्यक्ष संगीता देशमुख, सचिव डॉ.डी.एस.कोरे, कोषाध्यक्ष डॉ.उमाकांत चनशेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भारत दर्शन अंतर्गत ९ दिवसाच्या गोवा व कोकण दर्शनमध्ये १५० वर सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. एक हजार रुपये शुल्क भरून आंतरभारतीचे आजीवन सदस्य होता येते, असे श्री हेलसकर यांनी या वेळी सांगितले. प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनिरुद्ध टाके, उदय लोणीकर, शेख अन्सार हातनूरकर, अनिस अन्सारी, शिवाजीराव बोचरे, जुनैद कुरेशी, नंदलाल पद्मावत, दामोदर कव्हळे, महेंद्र काळे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.