सुकू लागलेल्या ३५० वृक्षांना पाण्याची सोय; केमापूरकरांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा ध्यास
सेलू जि.परभणी : प्रचंड तापलेल्या उन्हामुळे जिकडे तिकडे दिसणारी रखरख, सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष यावर समाज माध्यमातून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणारे संदेश फिरतांना आपण पाहातो आहोत. पण, फक्त पर्यावरण संवर्धनासाठी बोलून काही होणार नाही, तर कृती करणे आवश्यक आहे. आणि वृक्षसंवर्धनासाठी हे कृतीशील पाऊल सेलू (जि.परभणी) तालुक्यातील केमापूर येथील गावकऱ्यांनी उचलून ३५० वृक्षांना पाण्याची सोय केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर परिसरात दोन वर्षांपूर्वी महाघनवन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या येथील वृक्ष संवर्धनासाठी नियोजन पूर्वक प्रयत्न केले. कधी टॅंकरने पाणी देऊन वृक्ष वाचवण्यासाठी काम केले.परंतु सध्या पाणी टंचाईमुळे घनवन प्रकल्प सुकू लागला. याची जाणीव ठेवून ग्रामस्थ नामदेव आंधळे यांनी चारशे फुट पाईप अंथरूण त्यांच्या बोअरवेलमधून झाडांना पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. सुकू लागलेला घनवन प्रकल्प आता उन्हाळ्यातही बहरेल. पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यासाठी अंकुश आंधळे, कैलास आंधळे,अक्षदा भास्कर गुठ्ठे, अक्षदा गोविंद गुठ्ठे, पूनम गुठ्ठे, अशोक बुधवंत, आदीनाथ बुधवंत, प्राजक्ता साळवे मदत करत आहेत. यासर्वांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देऊन वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला आहे.
भविष्यात केमापूरकरांच्या पर्यावरण संवर्धनाचा आदर्श लोक नक्कीच घेतील. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून दिल्याबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. – शरद ठाकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केमापूर