Baba Shree Kedarnath dham : बाबा केदारनाथचे गर्भगृहातून दर्शन पुन्हा सुरू; यात्रेकरूंची प्रचंड गर्दी
आतापर्यंत तीन लाख ५७ हजार ८७५ भाविकांनी घेतले दर्शन
बाबासाहेब हेलसकर, सेलू
जगप्रसिद्ध श्री केदारनाथ धाममध्ये १० मे रोजी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांच्या उसळलेल्या प्रचंड गर्दीमुळे दुसऱ्या दिवसापासून गर्भगृहातील दर्शन बंद करण्यात आले होते. मंगळवारपासून पुन्हा भाविकांना गर्भगृहातून दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. मंगळवारी, २१ मे रोजी ३८ हजार ६८२ भावकांनी गर्भगृहात बाबा केदारनाथचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली. दरम्यान, या वर्षी आतापर्यंत तीन लाख ५७ हजार ८७५ भाविकांनी बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी चार धाम यात्रेसाठी प्रचंड गर्दी असूनही, बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) सर्व भाविकांना गर्भगृहातून बारा तास दर्शन घेण्याची परवानगी दिली आहे. या काळात मंदिर समितीने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह चोख बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर बाबा केदारनाथ मंदिरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दर्शन टोकन मिळवण्यासाठी व दर्शन रांगेत दुपारी भर उन्हात चार -चार तास भाविकांना उभे राहावे लागत आहे. सोमवारी पहाटे चार वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यावर भाविकांना गर्भगृहातून दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली. दुपारी तीन वाजता केदारनाथला भोग अर्पण करण्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर दुपारी पावणे चार वाजल्यापासून भाविकांनी बाबा केदार यांचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी सात वाजता बाबा केदार यांची आरती झाली. त्यानंतर रात्री अकरा वाजता सभामंडपातून भाविकांनी शृंगार दर्शन घेतले. दरम्यान, यात्रेकरूंना गर्भगृहातून दर्शन घेण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली होती. त्यामुळे मंगळवारपासून भाविकांना गर्भगृहातून दर्शन देण्यात आले. मंगळवारी प्रथमच विक्रमी ३८६८२ भाविकांनी दर्शन घेतले. आतापर्यंत तीन लाख ५७ हजार ८७५ भाविकांनी दर्शन घेतले आहे. अशी माहिती बीकेटीसीचे कार्यकारी अधिकारी रमेशचंद्र तिवारी यांनी दिली आहे.
♦यात्रेकरूंचे बेहाल; अनेकांची माघार
बाबा केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी १६ किलोमीटर यात्रा मार्गावरील पायी यात्रेकरूंचे बेहाल होत आहेत. एकाच अरुंद मार्गावर घोडे-खेचर, डोली, पिठ्ठूवरून व पायी जाणे येणे प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे पायी यात्रेकरूंना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील यात्रेकरू आहेत. तसेच घोडे व खेचरवाल्यांना कोणतीही शिस्त पाळत नसल्याने धक्का लागून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, अरूंद रस्ते व प्रचंड गर्दी यामुळे त्रस्त अनेक यात्रेकरू दर्शनविना अर्ध्यातूनच माघारी फिरत असल्याचे चित्र आहे.
♦जागोजागी वाहतूक कोंडी
यमुनोत्री, गंगोत्री तसेच केदारनाथ महामार्गावर जागोजागी तासन् तास वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे चार चार तास वाहतूक ठप्प होत आहे. सीतापूर-सोनप्रयाग-गौरीकुंड मार्गावर ठिकठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीमुळे आठ ते दहा किलोमीटर अंतर पायी चालत जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.