‘निम्न दुधना’तून नदीपात्रात पाणी सोडले; पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाचा आदेश 

‘निम्न दुधना’तून नदीपात्रात पाणी सोडले; पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाचा आदेश 

सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील दुधना नदीकाठच्या गावांना पशुधन व पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ बुधवारी, २२ मे रोजी सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणाचे सहा दरवाजे उघडून सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 

जिल्हा परिषद परभणी यांची मागणी, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे व शासन आदेशानुसार दुपारी साडेतीन वाजता दुधना नदीपात्रात धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले. याद्वारे नदीपात्रात एकूण ५३४६ क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या गावांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याबाबत, कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत नदीकाठच्या गावांना महसूल विभागामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीनुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही निम्न दुधना प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी धरणाची जलाशय. पाणीपातळी ४२०.५९० मीटर, तर जीवंत पाणीसाठा उणे ०.२६२ दलघमी (उणे ०.११ टक्के), धरण मृतसाठ्यात आहे.

♦परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन

निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यास परतूर तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला. बुधवारी, २२ मे रोजी शेतकऱ्यांनी अभियंत्यास धारेवर धरत आंदोलन केले. यामुळे प्रकल्प कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी तातडीने घटनास्थळास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सद्यस्थितीत प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठी व जनावरांसाठी आवश्यक आहे. नदीपात्रात पाणी सोडले, तर स्थानिक शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागेल, त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडू नये अशी भूमिका घेत परतूर तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांनी नदीपात्रात पाणी सोडण्यास विरोध करत आंदोलन केले. मात्र, मृतसाठ्यावर कुणाला अधिकार घालता येणार नाही, वरिष्ठांचा निर्णय मान्य करावा, विरोध करु नका, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली. तेव्हा संतप्त शेतकऱ्यांनी मवाळ भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.

 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!