शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे; सेलूमध्ये सेंद्रिय योगिक शेती कार्यशाळा उत्साहात
ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
सेलू जि.परभणी : मानवाच्या आत्मिक विकासाबरोबरच तो शारीरिकदृष्ट्याही संपन्न झाला पाहिजे. यासाठी विषमुक्त शेती होणे गरजेचे आहे, असे मत सेलू येथे आयोजित सेंद्रिय व योगिक शेती कार्यशाळेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखेच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी, २० मे रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बी के तांदळे, मीनाताई बोर्डीकर सोमेश्वर गिराम, भगवान इंगोले, पठाण साहेब, प्रा.सूर्यवंशी साहेब, इंजिनिअर कोलते,प्रा.गोरे सर, राजहंस खरात, बालासाहेब गजमल, डॉ.सतीश मुळे ,सुनील पोळ , ब्रह्माकुमारी शांता बहेन, सविता बहेन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जसा अन्नाचा परिणाम मनावर, मनाचा विचारावर आणि विचाराचा स्वास्थ्यावर होतो. ही श्रृंखला अखंडित ठेवण्याचे काम शेतकरीच करू शकतो. कोविड काळामध्ये जग बंद पडलं होतं पण शेती बंद पडली नाही. शेतकऱ्यांनी प्रत्येकाला अन्न पुरवण्याचे काम अहोरात्र केले आहे, असे मत या वेळी मांडण्यात आले. सेंद्रिय शेतीसाठीच्या शासकीय योजना, सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. सारिका बहेन यांनी आभार मानले. कार्यशाळेला अनिता बहेन, शिल्पा बहेन, दिपा बहेन,वैशाली बहेन, सीमा बहेन, राधा बहेन आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.