वालूरकर दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान; १६३ वर्षाची परंपरा
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील वालुर येथील अण्णासाहेब महाराज वालुरकर दिंडीचे मंगळवारी, २५ जून रोजी वालूर येथून आळंदीकडे प्रस्थान झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी सोहळ्यात माऊलींच्या रथामागे १५ क्रमांकावर वालूरकर दिंडीचा क्रमांक आहे.
१६३ वर्षाची परंपरा लाभलेल्या या दिंडीच्या भक्तांनी अण्णासाहेब महाराज वालूरकर यांच्या समाधीस्थळापासून ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या जयघोषात दिंडीमध्ये जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत. अण्णासाहेब महाराज वालूरकर यांनी दिंडीची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र बापूसाहेब महाराज वालूरकर यांनी दिंडीची धुरा समर्थपणे सांभाळली व फडाचा विस्तार केला.आपुलकी, माया व अध्यात्म यांची सांगड घालून हजारो वारकऱ्यांना त्यांनी विठ्ठल भक्तीच्या प्रवाहात आणले. बापूसाहेब महाराज यांना त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक बालासाहेब चौधरी व धाकटे बंधू स्वातंत्र्यसैनिक रावसाहेब चौधरी यांची मोलाची साथ लाभली.
सध्या बापूसाहेब महाराज यांचे सुपुत्र पुरुषोत्तम महाराज दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. विशेष म्हणजे पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे २८ जून शुक्रवाररोजी श्रीक्षेत्र आळंदी येथे माऊलींच्या मंदीरात व ०३ जुलै बुधवाररोजी सासवड येथे माऊलींच्या पालखीसमोर पारंपरिक मानाची कीर्तनसेवा होईल, असे विजय चौधरी यांनी सांगितले.