ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निरसन व्हावे : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक उत्साहात
परभणी : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निरसन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी केले.
जिल्हाकधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक पार पडली. त्यावेळी डॉ.काळे बोलत होते. याप्रसंगी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त अ.ए.चौधरी, डॉ.डी.जी.वडमिलवार, सहायक मोटर वाहन निरीक्षक जयंत अंकमवार, वैधमापन निरीक्षक संभाजी बिल्पे, अभियंता महेश लांडगे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे डॉ.विलास मोरे व सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित विभागांमार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. यानंतर बैठकीत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्यात अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या विविध तक्रारी मांडल्यात. प्राप्त झालेल्या तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या माध्यमातून ग्राहकांचे अनेक प्रश्न सोडवले गेल्याबाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी समाधान व्यक्त केले. तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित विभागांना योग्य त्या कार्यवाहीस्तव सूचना डॉ.काळे यांनी दिल्या. तसेच सर्व संबंधित विभागांना पत्राद्वारे योग्य ती कार्यवाही करून अहवाल मागवण्याबाबत कळविले आहे. या वेळी नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांचा यावेळी सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.