‘लाडकी बहीण’ साठी इतर योजनांचा बळी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
जिंतूर येथील सभेत आरोप, शिवस्वराज्य यात्रेला मोठी गर्दी
परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी, १७ ऑगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूर येथे जाहीर सभा झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीही भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारच्या धोरणांवर, फसव्या योजनांवर जोरदार टीका केली. फारसा विचार न करता राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असून यासाठी सरकारी तिजोरीत पैसेच नसल्याने इतर योजनांचा बळी दिला जात आहे. ही योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचे ठरले असल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी या वेळी केला. या वेळी खासदार डॉ.फौजिया खान, आमदार राजेश टोपे, महेबुब शेख, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, विजयराव गव्हाणे, आयोजक माजी आमदार विजय भांबळे, अशोक काकडे, भीमराव हत्तीअंबीरे, राजेंद्र लहाने, प्रेक्षा भांबळे, मनीषा केंद्रे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जनता पक्षाला राज्यातून हद्दपार करा : खासदार डॉ.अमोल कोल्हे
खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, की भारतीय जनता पक्षाने राज्यातील राजकारणाची प्रंचड नासाडी केली आहे. शेतकऱ्यांचे, तरूणांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे राज्याची अस्मिता आणि स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी तसेच शेतकरी आणि तमाम जनतेच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला हद्दपार करा.
खासदार डॉ.कोल्हे म्हणाले की, लोकसभेत राज्यातील ४८ जागांपैकी ३१ खासदार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने पंतप्रधानाची सुद्धा भाषा बदलली आहे. समान नागरी कायद्याची भाषा बोलणारे सेक्युलर सिविल कोडची भाषा बोलत आहे. हा बदल जनतेने घडवला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकांना हमीभाव नाही, उलट मोठ्या प्रमाणावर आयात करून भाव पाडले. बहिणींना ओवाळणी घातली पण सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही. राज्यातील उद्योग गुजरात वळवून बेरोजगारी वाढविली. आणि राज्यात सत्ता येत नसल्याचे लक्षात येताच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे तुतारीच्या आवाजाने कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या पाहिजेत. विकासाचा दुष्काळ दुर करण्यासाठी विजय भांबळे यांना आमदार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहन डॉ.कोल्हे म्हणाले.
गद्दारांना जागा दाखवू : विजय भांबळे
माजी आमदार विजय भांबळे यांनी नाव न घेता विद्यमान आमदार तसेच पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या पदाधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार भाषणात घेतला. राज्याचे गृहमंत्री यांचा दबाव आणून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन मुख्य प्रशासक व अशासकीय प्रशासक मंडळाविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. व्यापारी संकुल बेकायदेशीर ठरवले. यामुळे शहरातील व्यापारी दहशतीखाली असून, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आपले सरकार येणार आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा हिशोब घेतल्या जाईल आणि गद्दारांनाही त्यांची जागा दाखवून देऊ, असे सांगितले.
ठिकठिकाणी जोरदार स्वागत
शिवस्वराज्य यात्रेचे परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले. शुक्रवारी सायंकाळी गंगाखेड येथे माजी आमदार सीताराम घनदाट, तर शनिवारी पाथरी येथे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जाहीर सभा आयोजित केल्या होत्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. परभणी शहरातही जोरदार स्वागत झाले. पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली. सेलू येथील जिंतूर नाक्यावर शिवस्वराज्य यात्रेचे जेसीबीतून पुष्पवृष्टी व पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सभेला मोठी गर्दी जमली होती.