निम्नदुधना : आठ दरवाजातून विसर्ग

निम्नदुधनाआठ दरवाजातून विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, ५६ तासांत आले ११६ दलघमी पाणी

सेलू/परभणी : पाण्यासाठी तहानलेल्या सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात मागील ५६ तासात सोमवारी(दोन सप्टेंबर) दुपारी दोन वाजेपर्यंत ४७.९३ (११६.०८३ दलघमी) टक्क्यांची वाढ झाली आहे. धरणाचे क्रमांक १, २०, ५, १६, ६, १५ आणि १४ ही आठ दरवाजे दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने ०.५० मीटरने उचलून सुमारे १३ हजार ०५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत असून नदीला पूर आला आहे.

दुपारी बारा वाजता धरणाचे चार दरवाजे उघडून ६५२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात आला, तर दुपारी दोन वाजता पुन्हा चार दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहावे, असे निम्न दुधना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

गेल्या दोन दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूआहे. सोमवारी सकाळी धरणक्षेत्रात १९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूआहे. एक जूनपासून धरणात ७८.००३ दलघमी पाण्याची आवक झाली. मात्र, मागील ५६ तासात धरणाचा जिवंत पाणीसाठा २४.१० टक्क्यावरून (५८.३६५ दलघमी) सोमवारी (दोन सप्टेंबर) दुपारी दोन वाजता  ७२.०३ टक्क्यावर (१७४.४४८ दलघमी) गेला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ४२५.०५० मीटर आहे. ३१ ऑगस्ट रोजी शनिवारी निम्न धरणात २४.१० टक्के जिवंत पाणीसाठा होता. शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळपासून रात्रीपर्यंत पावासाचा जोर कायम होता. त्यामुळे सायंकाळी जिवंत साठा २६.४४ टक्क्यावर गेला. सोमवारी सकाळी सहा वाजता ६१.९३  टक्के, सकाळी आठ वाजता ६६.५१ , दहा वाजता ७०.८५, दुपारी बारा वाजता ७१.०८ टक्क्यावर गेला. तर दुपारी दोन वाजता ७२.०३ टक्के झाला. यामुळे मागील ५६ तासांत ४७.९३ टक्के एवढे मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात आले. पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्पाच्याखाली नदीकाठच्या गावांतील नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, आपापल्या जनावरांची काळजी घेणे वित्त, जीवितहानी होऊ नये, याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्याबाबत जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सु.भी.कोरके यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना सोमवारी पहाटे पत्र देऊन कळविले. त्यानुसार सद्यस्थितीत आठ दरवाजातून दुधना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती शाखा अभियंता बालासाहेब मार्गे यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!