अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान

अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान

५० महसूल मंडळात पावसाचे थैमान, पाथरीत सर्वाधिक ३१४ मिलीमीटर पाऊस

परभणी : परभणी जिल्ह्यात सर्वत्र मागील दोन दिवसांपासून धो-धो पाऊस बरसत असून ५२  पैकी ५० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाथरीत सर्वाधिक ३१४.५ मिलीमीटर पाउस झाला आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पावसाचा जोर रविवारी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत कायम राहिला. सोमवारी, दोन सप्टेंबर रोजी पहाटेपासून काही भागात जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदीनाल्यांना पूर आलेला आहे. शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर आदी शेतपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या

शनिवारी सायंकाळपासून विजेच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यांसह पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले. यामुळे जवळपास सर्वच महसूल मंडळात मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले असून हाती तोंड आलेल्या घास अतिवृष्टीने हिरावून नेला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शेतजमीनीत पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच नदी नाल्यांचे पाणी देखील शेतीमध्ये घुसून नुकसान झाले आहे. दरम्यान, सेलू तालुक्यातील वाई बोथ, निरवाडी, बोरकिनी या गावातील पन्नासहून अधिक जनावरे वाहून गेल्याचे सांगितले जात आहे, तर अनेक भागात वीज कोसळून शेळ्या तसेच काही जनावरे दगावल्याची माहिती आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची तसे तातडीने नुकसान भरपाईची मदत करण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकरी, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे.

जागोजागी वाहतूक ठप्प

रविवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे  ग्रामीणभागात अनेक ठिकाणी पूल खचल्याने तसेच नदी नाल्यावरून पाणी वाहून लागल्याने जागोजागी वाहतूक ठप्प झाली. दुधना, कसुरा, करपरा आदी नद्यासंह लहान मोठ्या नदीनाल्यांना पूर आला होता. यामुळे जिंतूर-परभणी, सेलू-पाथरी, सेलू-परभणी आदींसह प्रमुख महामार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळपर्यंत ठप्प होती.

वस्त्यांमध्ये घुसले पाणी

शहरी तसेच ग्रामीण भागातील सखल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घुसून संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीसह, गंगाखेड, पाथरी, सेलू, पूर्णा, सोनपेठ, जिंतूर, पालम शहरातील सखलभागातील वस्त्यांमध्ये आजुबाजुच्या नाल्याचे पाणी घुसले. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. स्थानिक पालिका प्रशासनाच्या पथकांनी तसेच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. परभणी शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, संजय गांधी नगर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर, डॉ. आंबेडकर नगर आदी परिसरासह अन्य वसाहतीमधील नाल्या पावसाच्या पाणी तुंबल्या. यामुळे या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे गोरगरीब लोकांचे हाल झाले. सेलू शहरातील छत्रपती शिवाजीनगर. रहेमाननगर, सहारानगर, अत्रेनगर, न्यू गुलमोहर कॉलोनी, डाँ झाकेर हुसेन नगर, विद्यानगर, राजीव गांधी नगर, घिसेखा नगर, राज मोहल्ला या भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते.शनिमंदिर रोड, हेमंतनगर, खंडोबा मंदिर रोड, नाला रोडसह अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.  विद्यानगर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

पुरात अडकलेल्यांच्या सुटका

सेलू तालुक्यातील बोथ या गावी पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघा ग्रामस्थांना सेलू महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमे्व्दारे सुखरूप बाहेर काढले. या गावातील अमोल बाळासाहेब जाधव, एकनाथ तुकाराम जाधव, दशरथ रामभाऊ जोगदंड, व राजेश दत्तराव जोगदंड हे चौघे गावालगत पुराच्या पाण्यात अडकले होते. ग्रामस्थांनी तात्काळ सेलूच्या महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकाऱ्यांना माहिती दिली. तेथून एक पथक या गावी दाखल झाले, पथकाने चौघांना सुखरूप बाहेर काढले.या चौघांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली आहे.

५० महसूल मंडळात अतिवृष्टी, पाथरी सर्वाधिक ३१४.५ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंच्या मागील २४ तासात सरासरी १३८.४ मिमी पाऊस झाला आहे. ५२ पैकी ५० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून परभणी १०८.८ पेडगाव १४४.५, जांब ९८.८ झरी १२०.३, सिंगणापूर ९१.८, दैठणा ९५, पिंगळी ५६, परभणी ग्रामीण ९०.५, टाकळी कुंभकर्ण ११८.८, गंगाखेड १०५.५, महातपुरी ११०.३, माखणी १०५.३, राणीसावरगाव ८५.८, पिंपळदरी ९७, पाथरी तालुक्यातील पाथरी ३१४.५, बाभळगाव २७७, हादगाव १३७.३ कासापुरी १८९, जिंतूर तालुक्यातील जिंतूर १६९.८, सांगवी १७९, बामणी १७७, बोरी १३१.८, आडगाव १४८.३,चारठाणा १६६, वाघी धानोरा १६६, दुधगाव १२६.३, पुर्णा तालुक्यातील पूर्णा ३२, ताडकळस १०६.३ , लिमला ७७, कातनेश्वर ६८.५, चुडावा ७५.५, कावलगाव ७७.५, पालम तालुक्यातील पालम ११९.५, चाटोरी९३.५, बनवस ७१.८, पेठशिवणी १२२.३, रावराजूर ९५, सेलू तालुक्यातील सेलू १४८.५, देऊळगाव १९५.५, वालूर २४६, कुपटा १४४.५, चिकलठाणा १८४, मोरेगाव १६८.८, सोनपेठ तालुक्यात सोनपेठ १७१, आवलगाव १५६.५, शेळगाव १५६.५, वडगाव ८४.३, मानवत तालुक्यातील मानवत २५६, केकरजवळा २०७, कोल्हा १६७.५, ताडबोरगाव १५४.८ आणि रामपुरी मंडळात २०३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!