कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी; ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद
सेलू जि.परभणी : दोन दिवस सततच्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यात झालेल्या शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, शेती अवजारे आणि घरांच्या पडझडीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी , चार सप्टेंबर रोजी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला. या वेळी जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी मंत्री मुंडे यांनी ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. नुकसान झालेल्या शेतीचे आणि पिकांचे पाहणी केली. आमदार बोर्डीकर यांनी तालुक्यात झालेले शेतकऱ्यांचे, पशुधनाचे शेतीचे आणि घरांचे पडझड नुकसान भरपूर प्रमाणात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती मंत्री मुंडे यांना दिली. यावेळी महसूल, कृषी, पंचायत समितीसह सर्व विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते. मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. लवकरच नुकसान भरपाई मिळेल. सरकार आपल्या बाबतीत संवेदनशील आहे. कोणीही काळजी करायची गरज नाही. आमदार मेघनादीदी आपल्या सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात, असे नमूद केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. दत्तराव कदम व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर तालुकाध्यक्ष ॲड. दत्तराव कदम, रवींद्र डासाळकर, माऊली ताठे, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, अनिल पवार, अशोक ताठे, महेश टाके, भास्कर आबा पडघन, केशव सोळंके, पांडू तात्या सोळंके, मुंजाभाऊ हरकळ, बाळासाहेब आघाव, कृष्णा शेरे, केदारेश्वर मोगल, प्रकाश गजमल, भगवान डक, सुंदर बरसाले, नारायण डोंबे, संदीप घुगे, गुलाबराव रोडगे आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.