जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी 

परभणी : जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी व ढगफुटी झाल्यामुळे शेतातील पिकांचे, पशुधनाचे तसेच गावातील पडझडीचे त्वरीत पंचनामे करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी (९ सप्टेंबर) दुपारी शेतकर्‍यांनी परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांनाही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बोर्डी गावातील शेतकर्‍यांच्या कसर, नागनगाव, डोहरा व वस्सा या शिवारात जमिनी असून दिनांक २ सप्टेंबर रोजी सुमारे १५० मि.मी.पाऊस झाल्यामुळे करपरा, रेपी, नागनी, पाचीपांडव या नद्या-ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या नद्यांच्या काठावर असलेल्या शेती असलेल्या शेतकर्‍यांची पिके जमिनीसहीत खरडून गेली. त्याचबरोबर शेती उपयोगी असलेले साहित्यही वाहून गेले आहे. त्यावेळी गुरांना चारा देण्यासाठी गेलेले शेतकरी चहुबाजुंनी असलेल्या पुरात अडकलेले होते. एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी आले होते. गावकर्‍यांनी शेतकर्‍यांची पोहुन सुटका केली. या पुरामध्ये औत, स्प्रिंकलर व पाईप, फवारणी पंप, कडब्याच्या गंजी, सोलार पंप, कोंंबड्या, शेतांतील गुरांच्या खोप्या पुर्णपणे वाहुन गेल्या असून त्याचे तलाठ्यामार्फत तात्काळ पंचनामे व्हावेत. तसेच एनडीआरएफ व एसडीआरएफचे निकष लावून तत्काळ नदी व ओढ्यांच्या दुतर्फा असलेल्या जमिनीचे वैयक्तीक पंचनामे करून पूर परिसरातील शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रूपयांपर्यंत तत्काळ मदत देण्यात यावी. पिक विम्याच्या माध्यमातूनही १०० टक्के रक्कम देण्यात यावी व सद्य परिस्थितीत २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर करावा. पुराचे पाणी घरात घुसल्याने घरांची पडझड व संसारोपयोगी साहित्याच्या नुकसानीपोटी प्रति कुटुंब २० हजार रूपयांची मदत देण्यात यावी व शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. जिंतूरचे तहसीलदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी यांनाही निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर डिंगाबर सवडकर, रामभाऊ सवंडकर, नारायण रेखाजी कदम, कुसुमबाई प्रभाकर हालगे, रामराव कदम, प्रल्हाद मानेजी कदम, माधव कदम, बापूराव कदम, संतोष कदम, लक्ष्मण जळबाजी सरकटे, विनायक कदम,नामदेव किशवराव कदम, मणकर्णा बाबाराव तळेकर, दरुबाई शेषराव कदम, आश्रोबा रंगनाथराव कदम, शामराव कदम, शामराव कदम,विकास कदम, लक्ष्मण मारोतराव कदम आदी शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!