सीताराम येचुरी यांचे निधन; डाव्या चळवळीचा आधारवड हरपला

सीताराम येचुरी यांचे निधन; डाव्या चळवळीचा आधारवड हरपला

अल्पचरित्र : दिलखुलास ‘कॉम्रेड’

प्रतिनिधी, नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे खंदे पुरस्कर्ते सीताराम सर्वेश्वर येचुरी यांचे गुरुवारी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी दीर्घ आजाराने दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. येचुरी यांचे पार्थिव अध्यापन आणि संशोधनासाठी शुक्रवारी ‘एम्स’कडे सुपूर्द करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर केला. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव वसंत कुंज येथील त्यांच्या निवासस्थानी आणि नंतर शुक्रवारी दुपारी माकपच्या ए.के. गोपालन भवन या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
येचुरी यांनी गेली साडेचार दशके विद्यार्थी नेते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ, पत्रकार आणि लेखक अशा विविध भूमिका समर्थपणे सांभाळल्या. येचुरी यांच्या पश्चात पत्नी व ज्येष्ठ पत्रकार सीमा चिश्ती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र आशीष यांचा २०२१ मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी करोनामुळे मृत्यू झाला. त्यातून सावरून येचुरी यांनी पक्ष व राष्ट्रीय राजकारणातील कार्य सुरू ठेवले होते. ‘इंडिया’च्या स्थापनेपासून या आघाडीच्या बहुतांश बैठकांमध्ये येचुरी यांची उपस्थिती होती. प्रकृती बरी नसतानाही गेले वर्षभर त्यांनी माकपच्या ‘पीपल्स डेली’ या मुखपत्राचे संपादक म्हणूनही लेखन सुरू ठेवले होते. येचुरी यांना गेल्या वर्षीपासून खोकल्याचा त्रास जाणवत होता. न्युमोनिया आणि फुफ्फुसाच्या व श्वसनलिकेतील संसर्गामुळे १९ ऑगस्टला त्यांना सर्वप्रथम ‘एम्स’ मध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांनी त्यांची प्रकृती सुधारली. मात्र, पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


अल्पचरित्र : दिलखुलास ‘कॉम्रेड’

पक्षाचे विचार आग्रहीपणे मांडतानाच व्यावहारिक भूमिका घेणारा विद्वान- अभ्यासू राजकारणी…. आंतरराष्ट्रीय राजकारणापासून चित्रपट गीतांपर्यंत गप्पांचे फड रंगविणारा जगन्मित्र… आणि सर्वपक्षीयांशी वैयक्तिक मैत्री जोपासणारा नेता…!
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे एक दिलखुलास ‘कॉम्रेड’ काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांना त्यांची संसदेतील अभ्यासू भाषणे आठवतात, तर विद्यार्थीदशेतील त्यांच्या मित्रांच्या मनात जुने चित्रपट पाहण्यासाठी दिल्लीत केलेल्या भटकंतीच्या आठवणी तरळून जातात. डाव्या पक्षांची घसरण होत असताना तीन वेळा पक्षाचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या येचुरी यांची कारकीर्द अशीच संघर्ष आणि समन्वयाचा मिलाफ आहे.

तत्कालीन मद्रासमध्ये (चेन्नई) १२ ऑगस्ट १९५२ रोजी एका तेलगू कुटुंबात येचुरी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आंध्र प्रदेश परिहवन विभागात इंजिनीअर आणि आई सरकारी अधिकारी.हैदराबादमध्ये प्रारंभिक शिक्षणानंतर ते दिल्लीत आले. सेन्ट स्टीफन्स महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयासह कला शाखेची पदवी घेतल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव पडला आणि कम्युनिस्ट पक्षाच्या ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’मध्ये (एसएफआय) ते सहभागी झाले. येचुरी आणि प्रकाश करात या जोडगोळीच्या प्रयत्नांमुळे ‘जेएनयू’ मध्ये डाव्या विचारांचा प्रचंड प्रभाव ‘ पडला. पुढे ते ‘एसएफआय’चे प्रमुख झाले. ‘जेएनयू’ मध्ये ते पीएचडी करत होते. मात्र, आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात अटक झाल्यामुळे त्यांची डॉक्टरेट पूर्ण होऊ शकली नाही.
राजकीय वाटचाल
‘एसएफआय’ मध्ये ते सहसचिव आणि पुढे अध्यक्षही झाले. काही काळातच त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीत समावेश झाला. संघटनात्मक कौशल्य आणि वक्तृत्व यांच्या बळावर त्यांची वेगाने वाटचाल झाली आणि १९९२मध्ये पक्षाच्या पॉलिटब्यूरो’चे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.
पक्षाचे ज्येष्ठ नेते हरकिशनसिंग सुरजित यांचा समन्वयवादी राजकारणाचा वारसा येचुरी यांनी पुढे चालविला. येचुरी आणि पी. चिदंबरम यांनी सन १९९६ मध्ये संयुक्त मोर्चा सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्याप्रमाणेच सन २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार स्थापन करण्यामागेही येचुरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाने सन २००८ मध्ये अणुकराराच्या मुद्द्यावरून डॉ. मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढला, त्यास प्रकाश करात यांची आग्रही भूमिका कारणीभूत होती. मात्र, पाठिंबा काढायचा असेल, तर महागाईसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर तशी भूमिका घ्यावी, असे येचुरी यांचे मत होते. अणुकरारासारख्या मुद्द्यावर जनमताची साथ न मिळाल्याने येचुरी यांचे म्हणणे खरे ठरले.
♠ कुशल संसदपटू
सन २००५ ते १७ या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. आर्थिक- सामाजिक घडामोडींपासून आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत त्यांची मुद्देसूद भाषणे संसदेत गाजली. तेलगू, मल्याळी, हिंदी व इंग्रजी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडक भाषेत त्यांनी हल्ले चढविले. मात्र, वैयक्तिक जीवनात त्यांची सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्री होती. संसदेत आणि अन्यत्रही ते गप्पांचे फड जमवून त्यामध्ये रंगून जात. राजकारणासह त्यांनी पुस्तके आणि विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही केले आहे.


Credit :Mata

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!