#Cotton Prices :कापसाचे भाव आठ हजारांतच अडकणार ?
आंतरराष्ट्रीय उलाढालीच्या आधारे तज्ज्ञांनी वर्तविला धोका
आरती गंधे, यवतमाळ : दोन दिवसांपूर्वी जळगावातील आडगावात नव्या हंगामासाठी कापूस खरेदीचा मुहूर्त साधण्यात आला. पहिल्या दिवशी ७, १११ रुपयांचा दर मिळाला. यवतमाळात हे दर साडेसात हजार रुपयांपर्यंत आहेत. नवा कापूस बाजारात आल्यानंतर हे दर ७,२०० रुपयांवर येतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे दर आठ हजारांहून अधिक दर वाढणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे नुकसान सहन करणारा शेतकरी या नव्या अंदाज दरामुळे हादरला आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट आली. शेतकऱ्यांना कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत जातील, अशी आशा होती. पण, भाव वाढलेच नाही. अनेक ठिकाणी ओल असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी पाच-सहा हजार रुपये दर दिला. पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांनी संधी साधली. काही ठिकाणी सीसीआयची केंद्रे सुरू झाली. पण त्यांच्या जाचक अटींमुळे मोजक्याच शेतकऱ्यांचा कापूस त्यांना विक्री करता आला.
राज्यात गेल्या वर्षी ४२ लाख ३० हजार १०७ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र कमी होऊन ४० लाख ८१ हजार २६६ हेक्टर इतके झाले आहे. सुमारे १५ टक्क्यांनी कापसाची लागवडीत घट नोंदविली गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात यंदा ५ लाख ४० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. ही परिस्थिती असतानाही कापसाचे दर कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
‘जागतिक बाजारपेठेचा विचार करता कापसाला सर्वाधिक दर भारतात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नियंत्रण न ठेवल्यास मोठ्या प्रमाणात कापसाची आयात होते. त्याचा परिणाम म्हणून भाव कोसळतात किंवा स्थिर राहतात. जागतिक बाजारपेठेचे विचार करता ७ हजार २०० ते आठ हजार रुपयांपर्यंत कापसाचे दर जाऊ शकतात. त्यापेक्षा दर वाढण्याची आज तरी शक्यता दिसत नाही,’ अशी माहिती आर्णीच्या बालाजी जिनिंग अँड प्रेसिंगचे संचालक बाळासाहेब निलावार यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
Credit : Mata