विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवली शक्यता, महायुतीचे जागावाटप येत्या आठ ते १० दिवसांत
मुंबई : ‘आगामी निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप येत्या आठ ते १० दिवसांत पूर्ण होणार असून, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात,’ अशी शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना वर्तवली. ही निवडणूक दोन टप्प्यांत होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. गणेशोत्सवा निमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्प्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील शक्यता वर्तवली. महायुती सरकारने राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनांवर भर दिला असून, या योजनांना नागरिकांची पसंती मिळत असल्याचे ते या वेळी म्हणाले.
‘मेरिट आणि स्ट्राइक रेट हा जागावाटपातील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. सध्या जागावाटपावर चर्चा सुरू असून येत्या ८ ते १० दिवसांत ते पूर्ण होईल’, असे शिंदे म्हणाले. ‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. महिलांचा या सरकारला पाठिंबा आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांमध्ये समतोल साधला जात असल्याने हे पाठबळ मिळत आहे,’ असे शिंदे यांनी नमूद केले.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत दीड लाख युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. ‘या सर्व युवकांना सहा ते १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेतून १० लाख लाभार्थ्यांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्टे आहे. तर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत आतापर्यंत १.६ कोटी महिलांना आर्थिक लाभ देण्यात आला आहे. अडीच कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे त्यांनी नमूद केले. ‘राज्यात परवडणाऱ्यांचा घरांची निर्मिती करतानाच, मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी या वेळी बोलून दाखवला. म्हाडा, सिडको, एमएमआरडीए यांसारख्या प्राधिकरणाच्या माध्यमांतून रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
CR- Mata