नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देण्याची गरज : उद्योजक विलास पौळ यांचे प्रतिपादन
सेलूच्या नूतन विद्यालयातील २२६ गुणवंतांचा सत्कार
सेलू : जीवनात यशस्वीतेसाठी, स्वतःला सिद्ध करावे लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम, सातत्य, संयमितपणा, आत्मविश्वास, आत्मचिंतन, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, चांगली वागणूक, परोपकारभाव आदी सद्गुणांच्या जोपासना करावी आणि खिलाडूवृत्तीद्वारे नेतृत्वगुणांचा विकास साधावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक विलास मधुकरराव पौळ यांनी केले.
सेलू जि.परभणी येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त; तसेच विविध स्पर्धा परीक्षा, कला क्रीडा क्षेत्रातील २२६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी श्री पौळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध उद्योजक विलास पौळ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेश गुप्ता, मुख्याध्यापक संतोष पाटील, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रा.संजय पिंपळगावकर आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती. नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी अभिवादन केले. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री.पौळ म्हणाले, की विद्यार्थ्यांनी संकटांना आव्हान समजून संयमाने सामोरे गेले पाहिजे. आयुष्यातील बहुमोल वेळ, पैसा वाया घालवून मानसिक स्वास्थ्य बिघडून टाकणार्या मोबाईल इंटरनेटच्या व्यसनापासून दूर राहून प्रगती साधावी. या वेळी श्री पौळ यांच्या हस्ते संस्था गुणवत्ता पारितोषिक तसेच पालक शिक्षक संघ व जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या गुणवत्ता पारितोषिकांनी २२६ विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय राजेंद्र सोनवणे यांनी दिला. या वेळी बाबासाहेब हेलसकर, अशोक लिंबेकर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या चलचित्रफितीद्वारे उद्योजक विलास पौळ यांचा कार्यप्रवास मांडण्यात आला. संतोष मलसटवाड यांनी याचे संयोजन केले. प्रा.पिंपळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय भाषण केले. स्वागत गीत सच्चिदानंद डाखोरे व विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी केले. यादी वाचन उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, सुनील तोडकर, गणेश माळवे यांनी केले. सूत्रसंचालन अनुजा सुभेदार यांनी केले. भगवान देवकते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक व पौळ कुटुंबियांसह शिक्षणप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले.