प्रामाणिक नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर
सेलूतील अक्षर व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे मत
सेलू/परभणी : शिक्षक हा देशाचे शेवटचे आशास्थान असतो. देशात जे घडते किंवा बिघडते त्याला शिक्षक जबाबदार असतो. त्यामुळे देशाच्या विकासाचा व्यापक विचार करणारी पिढी हवी. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणारे नागरिक घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे मत प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे ( कोल्हापूर ) यांनी केले.
सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने नूतन विद्यालयाच्या गिल्डा सभागृहात सोमवारी (१४ ऑक्टोबर) अक्षर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी गुंफले. ‘आम्ही भारताचे नागरिक ‘ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्जेराव लहाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नितीन लोहट (परभणी) उपस्थिती होते. डॉ.सुनीलकुमार लवटे म्हणाले ” कित्येक मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा मराठी शाळा बंद होणार असतील, तर मराठी भाषा बोलणारे नागरीक कसे घडतील. भारतीय असणे म्हणजे भारतीय परंपरा, मूल्य, भारत माहिती असणे आहे. शिक्षकांनी अंर्तमुख होणे आवश्यक आहे. कायदा प्रमाण मानणारे, राष्ट्राचे भविष्य घडवणारे नागरिक असले पाहिजेत. शिक्षक देशाचे चारित्र्य घडवतो. त्यामुळे शिक्षकांची आचारसंहिता महत्त्वाची आहे.” पाहुण्यांचा परिचय डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी करून दिला. प्रास्ताविक अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. तर सचिव डॉ. सुरेश हिवाळे यांनी आभार मानले. व्याख्यानाला शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, अरूण चव्हाळ, विलास पानखडे, संतोष पाटील, चंद्रशेखर मुळावेकर, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, माधव गव्हाणे, बाळू बुधवंत आदींसह परभणी, सेलू, जिंतूर, तालुक्यातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.