रायपूर शेतशिवारात चोरीचे सत्र सुरूच; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

रायपूर शेतशिवारात चोरीचे सत्र सुरूच; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रायपूर परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. रात्रीची गस्त मंदावली आहे. गत महिनाभरापासून चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी, केबल वायर, जनरेटर चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी – रामेश्वर गाडेकर, उपाध्यक्ष, बळीराजा संघर्ष समिती, सेलू

सेलू/परभणी : गेल्या काही दिवसांपासून रायपूर (ता.सेलू) परिसरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच एका शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील जनरेटर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एका शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटार वीजपंप चोरून नेल्याची घटना रविवारी,१३ ऑक्टोबररोजी उघडकीस आली. चोरीच्या या वाढत्या घटनामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे.  पोलिसांनी वाढत्या चोरींच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रायपूर येथील रामेश्वर गाडेकर यांनी शेतातील विहिरीवर ७० हजार रुपये किमतीचे असलेले जनरेटर बसवले होते. मात्र चोरट्यांनी काही दिवसातच ते जनरेटर चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आता येथील शेतकरी सुभाष काकडे यांनी सेलू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेत गट नं २२८ मध्ये मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून विहिरीमध्ये स्पॅन कंपनीची ३५ हजार रुपये किमतीची मोटार बसविली होती. सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाला पाणी देण्यासाठी मी १३ ऑक्टोबरला विहीरीवर गेलो असता मोटारीचे केबल वायर व पाण्यातील मोटार विहिरीत दिसून आली नाही. त्यामुळे मोटार शोधण्याचा प्रयत्न केला असता विहिरीतील पाण्यामध्ये ३५ हजार रुपये किमतीची असलेली मोटार व २ हजार रूपये किमतीचे वायर केबल असे ३७ हजार रूपयाचे चोरट्यांनी नुकसान केले आहे.

याबाबत सेलू पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान चोरलेल्या वीज मोटार भंगारात विकल्या जात असून, अशा या मोटार चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून विहिरीवर सध्या शेतकऱ्यांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. यामुळे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करून गुन्ह्याची लवकर उकल करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!