श्रीरामकथा : ऐक मुकुंदा, विनवू कितींदा…राधाकृष्णजी महाराज यांच्या भजनांनी सेलूकर झाले भक्तीरसात चिंब

श्रीरामकथा : ऐक मुकुंदा, विनवू कितींदा…राधाकृष्णजी महाराज यांच्या भजनांनी सेलूकर झाले भक्तीरसात चिंब

स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांची उपस्थिती, नृत्याचा ठेका धरीत श्रोत्यांनी लुटला मनसोक्त आनंद

सेलू : सेलू येथे सुरू असलेल्या श्रीरामकथेमध्ये स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, सोमवारी, २१ ऑक्टोबररोजी रात्री गोवत्स श्रीराधाकृष्णजी महाराज यांची भजनसंध्या झाली. या वेेळी राधाकृष्ण महाराज यांनी ‘ ऐक मुकुंदा विनवू कितींदा…’ या गवळणीसह विविध भजने भावभक्तीमय वातावरण गायली. महाराजांच्या भजनांनी सेलूकर श्रोते भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाले. मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी टाळ्या आणि नृत्याचा ठेका धरीत भजनसंध्येचा मनसोक्त आनंद लुटला.

येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावरील हनुमानगढ परिसरात श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या श्रीरामकथेचे आयोजन जयप्रकाश व विजयकुमार बिहाणी कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्त हा कार्यक्रम झाला. भजो भजो पांडुरंग विठ्ठला या भजनाने भजनसंध्येची सुरुवात झाली. मोहिले माझे मन, हरी तुझ्या मुरलीने मन मोहिले माझे, पांडुरंग विठ्ठला, पंढरीनाथा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ; कधी येशील माझ्या घरा, जब राम मेरे घर आयेंगे, माझे सद्गुरु अंगणी आले, ऐक मुकुंदा विनवू कितींदा, दास रघुनाथ का सखा श्रीनाथ का ,कुछ इधर की रहा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा आदी भजने राधाकृष्ण महाराजांनी गात संकीर्तन केले.  श्रोत्यांचा उत्साह ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनीदेखील श्रोत्यांमध्ये बसून संपूर्ण भजनसंध्येचा आनंद घेतला. श्रीराम कथेचे आयोजक जयप्रकाश बिहाणी यांनी प्रास्ताविक केले.

सेलूतील मंडळी भाग्यशाली

स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांची इथे श्रीरामकथा सुरू आहे. महाराजांचे संपूर्ण सेलूनगरीवर प्रेम आहे. हे खूप मोलाचे आहे. कारण संपूर्ण संसाराची उपलब्धी एकीकडे आणि एका संताचे प्रेम एकीकडे असते. संतांची सोबत प्रत्यक्षात भगवंतांची अनुभूती देते. म्हणून सेलूनगरीतील एखादा व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर जो आनंद सेलूकारांना मिळेल, त्याहीपेक्षा अधिक आनंद संतांची कृपा झाल्यानंतर मिळतो. ही सेलूकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून सेलूकर भाग्यशाली आहेत, असे गोवत्स श्रीराधाकृष्णजी महाराज यावेळी म्हणाले.

गोवत्स बालकांची संघटना उभी केली

आपल्या देशाचे भाग्य आहे की, संतांच्या पंक्तीत बसून संता सारखे जीवन जगून दाखवून, केवळ गोमातेची सेवा करणे हेच ध्येय ठेवणारे श्रीराधाकृष्णजी महाराज यांनी गोवत्स बालकांची संघटना उभी केली आहे. हे मोठे कार्य आहे, असे स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी यावेळी नमूद केले. या संकीर्तनामध्ये भक्त बसून गातात, तेव्हा भगवान उभे राहून ते ऐकतात आणि जेव्हा भक्त उभे राहून गातात. तेव्हा भगवान नृत्य करतात. आजच्या भजन संध्येचा रस आपल्या सर्वांसह भगवंतानी देखील इथे येऊन चाखला असेल, असेही स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी यावेळी नमूद केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!