‘मौसमग्राम’ : राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या ‘मौसमग्राम’ उपक्रमाचे उद्घाटन, ग्रामपंचायतीनाही कळणार हवामान अंदाज,
प्रतिनिधी, पुणे : देशातील सर्व शेतकऱ्यांना आता पुढील दहा दिवसांचा स्थानिक पातळीवरील, अद्ययावत हवामान अंदाज मिळणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘मौसमग्राम’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, देशातील सर्व ग्रामपंचायतींना तीव्र हवामानाच्या घटनांच्या पूर्वसूचनाही देण्यात येतील. पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, पंचायत राजमंत्री राजीव रंजनसिंह, सचिव डॉ. एम रविचंद्रन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नवी दिल्ली येथे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
‘आयएमडी’ ने दिलेल्या माहितीनुसार, ‘हर घर मौसम’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या ‘मौसमग्राम’ उपक्रमांतर्गत देशातील दोन लाख ६० हजार ग्रामपंचायतींना तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वारे आणि ढग आदी घटकांचा स्थानिक पातळीवरील अंदाज देण्यात येईल. दर तासाला पुढील ३६ तासांचा, दर तीन तासांनी ३६ तास ते पाच दिवस आणि दर सहा तासांनी पुढील पाच ते दहा दिवस या कालावधीसाठी हवामान अंदाज अद्ययावत होत राहतील. ग्राम पंचायतींच्या प्रतिनिधींना चक्रीवादळ, विजा, वादळी पाऊस, उष्णता किंवा थंडीची लाट आदी तीव्र हवामानाच्या घटनांच्या स्थानिक पातळीवरील पूर्वसूचनाही देण्यात येतील. मौसमग्राम उपक्रमातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना पेरणी, मशागतीची कामे, खते, औषधे फवारणीची वेळ ठरवण्यासाठी होऊ शकतो. स्थानिक पातळीवरील हवामान अंदाज तसे मौसमग्राम तसेच पंचायती राज मंत्रालयाच्या ‘ई ग्रामस्वराज’ आणि ‘मेरी पंचायत’ या मोबाईल अॅपवर पाहता येतील.
चार दिवस पावसाचा अंदाज
राज्यात २९ ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या ऐन दिवाळीच्या कालावधीत काही ठिकाणी पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे. दाना चक्रीवादळाचे अवशेष म्हणून राहिलेल्या बाष्पाच्या प्रभावामुळे २९ तारखेला विदर्भात, ३० रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात, तर ३१ आणि एक तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढही होईल, असे ‘आयएमडी’ने अंदाजात म्हटले आहे.
मौसमग्राम’ काय करणार?
■ देशातील दोन लाख ६० हजार ग्रामपंचायतींना तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वारे आणि ढग आदी घटकांचा स्थानिक पातळीवरील अंदाज देण्यात येईल.
■ दर तासाला पुढील ३६ तासांचा, दर तीन तासांनी ३६ तास ते पाच दिवस आणि दर सहा तासांनी पुढील पाच ते दहा दिवस या कालावधीसाठी हवामान अंदाज अद्ययावत होतील.
■ ग्राम पंचायतींच्या प्रतिनिधींना चक्रीवादळ, विजा, वादळी पाऊस, उष्णता किंवा थंडीची लाट आदी तीव्र हवामानाच्या घटनांच्या स्थानिक पातळीवरील पूर्वसूचनाही दिली जाणार.
फायदा काय होणार?
■ शेतकऱ्यांना पेरणी, मशागतीची कामे, खते, औषधे फवारणीची वेळ ठरवण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल.
■ तीव्र हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करणे शक्य होईल
CR- Mata