मनोज जरांगे पाटील : २० ते ३० जागा लढणार; पाठिंबा आणि पाडापाडीचेही सूत्र…
जालना, दि ३ : दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी शेवटचा दिवस आहे. ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत, तर माझी राज्यभरातील मराठा समाजाला विनंती आहे की, तुमच्या मतदारसंघाचं नाव आलं नसेल तर आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी दहा ते पाच असेनात, पण निवडून आणायचं आहे, असे स्पष्ट करून , गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावं”, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी प्रस्थापिताना दिला आहे.
सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. एका जातीवर निवडणूक लढणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोणीही हट्ट करून मतदारसंघ वाढवू नये. दिलेले उमेदवार विजयी करण्यासाठी काम करावे, आरक्षित जागेवर पाठिंबा द्यावा आणि इतर ठिकाणी पाडापाडी करावी, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. जरांगे पाटील यांनी रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. दिवसभरात २५ मतदारसंघांवर चर्चा झाली.
अन् जरांगे यांच्या कडा झाल्या ओल्या… मराठासमाजावर सरकारने खूप अन्याय केला आहे. हातातोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिरावून घेतला आहे. आम्हाला राजकारणाची हौस नाही. परंतु, त्यांनी आम्हाला तिथे ओढलं आहे. आम्ही आमच्या समाजावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणार असून, समाजाचे बळ वाढावे म्हणून कुटुंबाला दूर ठेवून आपण लढा देत आहोत, असे सांगताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.
मराठा-मुस्लीम-दलित ‘एमएमडी’ समीकरण- जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लीम आणि दलित समाज असे समीकरण तयार करत उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे. – दोन दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्याशी मनोज जरांगे यांनी बंदद्वार प्रदीर्घ चर्चा केली होती. – त्यानंतर या तिघांनीही पत्रपरिषदेत ‘एमएमडी’ समीकरणाची मोट बांधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मराठा समाज, मुस्लीम समाज आणि दलित समाजाची ताकद जिथे आहे, तेथे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा, मुस्लीम, दलित, गरजू ओबींसींसह १८ पगड जातींचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मोजक्याच जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. ते उमेदवार जिंकून आणायचे आणि इतर ठिकाणी पाडापाडी करायची, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान, पाथर्डी व शेवगाव, करमाळा, वसमत, हिंगोली, कन्नड, पाथरी, गंगाखेड, लोहा, कंधार, तुळजापूर, भूम-परंडा, कोपरगाव, नेवासा, पाचोरा, माढा, धुळे, निफाड आणि नांदगाव या विधानसभा मतदारसंघांबाबत रात्री उशिरापर्यंत जरांगे यांची चर्चा सुरू होती. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा अंतिम दिवस आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवार अंतिम केले जातील. २० ते ३० जागा लढविल्या जाणार असून, त्यात वाढ होईल किंवा कमीही होतील, असेही जरांगे म्हणाले.
पाठिंबा आणि पाडापाडीचेही सूत्र
मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणारे आणि राज्यभरात चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते काही मुस्लिम आणि दलित उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत. मराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरला आहे. ‘त्रास देणाऱ्यांना पाडून बदला घ्यायचा’ अशी रोखठोक भूमिका घेत त्यांनी आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.
अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी रविवार (दि ३ ) दिवसभर प्रत्येक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. मतदारसंघ निश्चित करणे, उमेदवार देणे याबाबत चर्चा करण्यात आली. या ठिकाणी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, ‘एक- दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचे तर व्हा, जिथे ताकद आहे, तिथे जोर लावायचा आहे. जिथे ताकद नाही तेथील योग्य उमेदवार निवडून बाकी पाडापाडी करायची आहे. आमचा निवडणूक हा खानदानी व्यवसाय नाही. फडणवीस यांनी बेजार केले म्हणून विधानसभा लढविण्याचे ठरवले आहे. मुस्लिम आणि दलित नेते त्यांच्या जागा सांगतील. आमच्या विचाराचे एस.सी. आणि एस.टी.च्या उमेदवारांना मराठ्यांचे मतदान करायचे आहे. जिथे पाठिंबा देणार त्या उमेदवारांकडून बाँड लिहून तसेच व्हिडिओग्राफीदेखील करून घेणार आहेत; पण ते काही व्हायरल करणार नाही.’