विकासाची धमक महायुतीमध्येच : अजित पवार
महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ मानवत येथे जाहीर सभा
परभणी : विरोधी पक्षाच्या अपप्रचारावर व खोट्या भूलथापांना कोणीही बळी पडू नका. आरोप – प्रत्यारोप करून रोजी-रोटीचे आणि विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. विकासात्मक योजना राबविण्याकरीता धमक आणि ताकद असावी लागते, तरच कामे होतात. महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाची धमक केवळ भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या नेतृत्वामध्ये आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे उमेदवार तथा आमदार राजेश विटेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी, १३ नोव्हेंबररोजी मानवत शहरात आयोजित सभेत श्री.पवार बोलत होते. या वेळी उमेदवार विटेकर, प्रताप देशमुख, अनिलराव नखाते, भावना नखाते, भाजपाचे नेते विलास बाबर यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी, नेते आदींची व्यासपीठीवर प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात पवार म्हणाले की, परभणी जिल्हा विकासाच्या दृष्टीने खूप मागे राहण्यास निष्क्रिय लोकप्रतिनिधींची परंपरा कारणीभूत आहे. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी विकासकामांना कधीच प्राधान्य दिले नाही. आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला विकास काय असतो, तो करुन दाखवू, आमच्यात रग आहे. हिम्म्त आहे. प्रशासनावर आमची पकड आहे. त्यामुळे सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने जे काही करता येईल ते निश्चितपणे करु, लाडकी बहिण आणि महायुती सरकारच्या सर्व योजना पुढेही पाच वर्ष चालू राहातील, असा विश्वास व्यक्त करून विटेकर यांना साथ द्या, पुढील पाच वर्षात पाथरी मतदारसंघात चार हजार कोटींची विकास कामे करु, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.
गोदावरी दुधना सहकारी साखर कारखान्याचे विस्तारिकरण करून गाळप क्षमता दुप्पट करू, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लावू, संत साईबाबा यांच्या भूमीच्या विकास आराखड्याकरीता भरीव निधी उपलब्ध करून देऊ, तीर्थक्षेत्र नृसिंह पोखर्णीसह अन्य स्थळांना पर्यटनाचा दर्जा देऊन विकास करू, पैठणच्या नाथसागरातून तसेच निम्न दुधना प्रकल्पातून उपसा जलसिंचनाव्दारे मतदारसंघातील सिंचनापासून वंचित ५४ गावांना सिंचनाखाली आणण्याकरिता व शेतीचा शाश्वत विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढाकार घेणार तसेच रस्ते, भूमिगत गटारे व मूलभूत विकास कामे मार्गी लावू, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. सत्तेत आल्यावर केंद्र सरकारकडून मोठा निधी खेचून आणण्याची धमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यामध्ये आहे, असे श्री.पवार म्हणाले. कॉंग्रेसने आरक्षणाबद्दल चकार शब्दही बोलू नये, कारण आंबेडकरी चळवळीस आणि विधारधारेस छेद देण्याचे काम कॉंग्रेसने सातत्याने केले आहे. आता त्यांना आंबेडकरवाद्यांचा पुळका आला आहे, असा आरोप श्री.पवार यांनी सभेत केला. या सभेत दादासाहेब टेंगसे, संजय रनेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत श्री.पवार यांनी केले. सभेला महिला, पुरूष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.