बोर्डीकर कुटुंबियांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही : डॉ.संजय रोडगे
सेलू तालुक्यातील धनगर समाज बांधवांची बैठक, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
सेलू : जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील अनेक वर्षापासून बोर्डीकर कुटुंबीय सत्तेत असताना कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. तसेच मा. आ. मेघनादीदी यांनीही मागील पाच वर्षांमध्ये मतदारसंघांमध्ये विकासाचे तसेच वैयक्तिक कोणीही त्यांच्याकडे काम घेऊन आले असता, त्यांनी त्यांची कधी जात किंवा पक्ष न विचारता कामे केलेली आहेत. मागील दहा वर्षांमध्ये देशात मोदीजींनी जे काम केलेले आहे त्यावरून सर्वांना आपल्या हक्काचे घर असेल, पिक विमा असेल तसेच शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सर्वांना त्यांचा लाभ आमदार मेघना बोर्डीकर यांनी मिळवून दिला आहे, असे प्रतिपादन डॉ.संजय रोडगे यांनी केले.
श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार संकुल येथे सेलू तालुका धनगर समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, सुरेश भुमरे, भागवत दळवे, ॲड.दत्तराव कदम, दिनकर वाघ, अजय डासाळकर, माऊली ताठे, रंगनाथ सोळंके, बाबा काटकर, अविनाश शेरे, प्रकाश गजमल, ऋषिकेश सोपणार, शिवहरी शेवाळे, दत्तराव मोगरे, विलास सरोदे, गणेशराव काळे, सुदामराव रोकडे, किशोर कारके, भागवत बोबडे, भागवत अण्णा दळवे, दौलत माने, तुकाराम महाजन, गोरख रोकडे, दुर्गादास आळसे, शिवाजी हिंगे, शुभम खुलासे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाजातील नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या त्याबाबत सर्वांना सांगितले. भारतातील सर्वच स्तरातील जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवणारे पहिले पंतप्रधान मोदी आहेत. महाराष्ट्रामध्ये जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम शरदचंद्र पवार यांनी केले. गावांमध्ये सर्व जाती धर्मातील जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. पवारएवढे वर्ष सत्ता भोगली परंतु समाजासाठी काहीही केले नाही. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान या जनतेने पवार दिला. परंतु त्यांनी एकही निर्णय मराठा समाजासाठी घेतला नाही. तसेच धनगर समाजासाठीही घेतला नाही. हे काम केवळ आपल्या भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात तसेच देशात केले. विश्वकर्मा योजनेचे जनतेला झालेला फायदे यावेळी सांगितले.
अध्यक्ष समारोपप्रसंगी डॉ.रोडगे म्हणाले की, काल परवा संभाजीनगर येथील सभेत शरदचंद्र पवार साहेब म्हणाले की, औरंगाबादचे जे नामकरण संभाजीनगर हे झालेले आहे, तसेच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर हे झालेले आहे.आमचे सरकार आले, की परत आम्ही यामध्ये बदल करून औरंगाबाद व अहमदनगर हे करू, हे कितपत योग्य आहे. असा यावेळी प्रश्न उपस्थित केला. मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःचे बलिदान दिले, परंतु धर्म बदलला नाही. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मुघलांशी व इंग्रजांशी झुंज देऊन एक पराक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा केला. त्यांना यांचा विरोध अशा प्रकारे असेल, तर जनतेनेही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नये.
माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना आम्ही तन-मन-धनाने मदत केली. दिवस-रात्र एक करून प्रचार केला. यामध्ये आम्ही कधीही जातीचे राजकारण केले नाही. त्यावेळी आम्हाला डुप्लिकेट मराठा असेही संबोधण्यात आले. परंतु आम्ही न खचता मनामध्ये कुठल्याही जाती द्वेष न करता, आम्ही प्रामाणिकपणे काम केले. खऱ्या अर्थाने जातीवाद करणारे कोण आहेत, हे आज जातीच्या नावावर मते मागत आहेत. १९९१ मध्ये शिवसेना पक्ष फोडण्याचे पाप शरद पवारांनी केले. जैसी करनी वैसी भरनी याप्रमाणे आज त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे यावेळी सांगितले. सुरेश भुमरे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत करतांना आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पाठीमागे भावाप्रमाणे भक्कम उभे राहून साथ देण्याचे यावेळी उपस्थित समाज बांधवांना आवाहन केले. प्रास्ताविक भागवत दळवे यांनी केले. सूत्रसंचालन डिगांबर टाके यांनी केले.आभार ॲड.दत्तराव कदम यांनी मानले.