आघाडीचा सुपडा साफ होणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथे विराट सभा
सेलू/परभणी : वर्षानुवर्षापासून सत्ता भोगलेल्या आणि अजुनही सत्तेकरीता हापापलेल्या काँग्रेसजणांकडून लोकसभेपाठोपाठ हरियाणा व आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतसुध्दा मोठ्या प्रमाणावर नकारात्मक, अपप्रचार करून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसजणांचे हे प्रयत्न हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातील जागरुक मतदार हाणून पाडतील आणि २३ तारखेला महायुतीचे सरकार स्थापन करून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ करतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जिंतूर (जि.परभणी) येथील विराट जाहीर सभेत बोलतांना केला आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तथा भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी जिंतूर येथील साई मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. सभेला प्रंचड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यावेळी शहा बोलत होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, हरिभाऊ लहाने, उमेदवार तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्रताप देशमुख, संतोष मुरकुटे, व्यंकटराव शिंदे, गंगाधरराव बोर्डीकर, राधाजी शेळके, सुरेश घुमरे, ॲड.दत्तराव कदम यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि नेत्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे, असा विश्वास देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसची ध्येय धोरणे, नेतृत्वासह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. जम्मू काश्मिरच्या विधानसभेत ३७० कलम पुन्हा बहाल करण्याचा ठराव मंजुर करीत काँग्रेसजणांनी देशविरोधी भूमिका बजावली आहे. हे प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाहीत. “राहुल बाबा, तुमची चौथी पिढीही आता ३७० कलम पुन्हा लागू करु शकणार नाही, ” असे शहा यांनी ठणकावले. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या प्रश्नावर हेतुतः विरोध केला. न्यायालयात खटला प्रलंबित राहावा, यासाठी पराकाष्टा केली. अखेर न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर मोदी सरकारने जन्मभूमीत श्रीरामाची यथायोग्य प्राणप्रतिष्ठापना केली. काशी विश्वनाथ कॅरिडोअरद्वारे काशी तीर्थक्षेत्रास भव्यदिव्य असे स्वरुप आले, असे शहा यांनी सांगितले. जिंतूर मतदारसंघातील झालेल्या मोठ्या विकासकामानंतर पुन्हा विकासाची गॅरंटी देत, मेघना बोर्डीकर यांना विजयी करण्याचे आवाहन श्री.शहा यांनी सभेत केले.
मराठावाड्याचा वेगाने विकास करणार
दोन वर्षाच्या महाविकास आघाडी सरकाच्या काळात महाराष्ट्राला विकासापासून रोखण्यात आल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. मराठवाड्यातील ४०० हजार कोटींची मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बासनात गुंडाळली गेली. द्वेषापोटी विकास कामे थांबवली. परंतु, महायुतीचे सरकार सत्तेत आल्या पाठोपाठ या योजनांना मोठा निधी उपलब्ध करून त्या जलदगतीने पुढे नेल्या आहेत. आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाच्या योजना प्रचंड वेगाने मार्गी लावू, असा विश्वास श्री.शहा यांनी व्यक्त केला. पूर्णा नदीवरील येलदरी पुल, जिंतूर मतदारसंघांतर्गत रस्ते महामार्ग विकास, प्राचीन मंदिर जिर्णोध्दाराची कामे जलदगतीने पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाकरीता प्राधिकरण स्थापन केले जाईल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक मिलीयन डॉलरपर्यंत पोहोचावी, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, सोयाबीनला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला जाईल, शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ केले जाईल. शेतकरी सन्मान निधीसुध्दा १५ हजार रुपयांपर्यंत वाढविला जाईल, अशी ग्वाही श्री.शहा यांनी सभेत बोलतांना दिली.